नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणारा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत केली आहे. राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्याबाबत देशातील नागरिकांकडून अनेक सूचना आल्या होत्या. लोकांच्या भावनांचा आदर ठेवून खेल रत्न पुरस्कार आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष हॉकी संघाने अपवादात्मक कामगिरी केली. हॉकीमध्ये आमच्या खेळाडूंनी जी इच्छाशक्ती दाखवली. ती भविष्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे.
मेजर ध्यानचंद हे भारतातील अग्रगण्य खेळाडूंपैकी होते. त्यांनी भारताला सन्मान आणि अभिमान मिळवून दिला. त्यासाठी आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च क्रीडा सन्मान त्याच्या नावावरुन ठेवणे योग्य आहे, असे मोदी यांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला ५-४ ने पराभूत करत कांस्यपदक पटकावलं. हॉकी संघाच्या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारताच्या पुरुष हॉकी संघाचे कौतुक केलं. पुरुष हॉकी संघाचा कॅप्टन मनप्रीत सिंह याला पंतप्रधान मोदींनी फोन करुन अभिनंदन केले. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.
ऑलिम्पिकच्या महिला हॉकीमध्ये आपले पदक थोडक्यात हुकले. मात्र या संघात नव भारताचे चैतन्य प्रतिबिंबित होत आहे. जिथे आपण आपली सर्वोत्तम कामगिरी करत नवी उंची गाठतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
टोकियो ऑलिम्पिकमधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
'ऑलिम्पिकमधली आपल्या महिला हॉकी संघाची शानदार कामगिरी आपल्या सदैव स्मरणात राहील. त्यांनी त्यांची सर्वोत्तम कामगिरी केली. संघातल्या प्रत्येक खेळाडूने साहस, कौशल्य आणि चिकाटीचे दर्शन घडवले. उत्तम कामगिरी करणाऱ्या या असामान्य संघाचा भारताला अभिमान आहे,' असे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.