एआयमुळे पुढील 35 वर्षांत कार्यबलात मोठे बदल अपेक्षित
काही नोकऱ्या कमी होणार; पण नव्या क्षेत्रांत रोजगारनिर्मिती वाढणार
‘अपस्किलिंग’ आणि ‘रीस्किलिंग’ हेच करिअर सुरक्षिततेचे सूत्र
धोरणांपेक्षा वैयक्तिक कौशल्य विकासावर लक्ष देण्याचा सल्ला
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) नोकऱ्यांवर गदा येईल का, या वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांनी कर्मचाऱ्यांना स्पष्ट संदेश दिला आहे ‘घाबरू नका, स्वतःला सातत्याने अपडेट ठेवा.’ एआय इम्पॅक्ट समिट 2026मध्ये ‘द फ्युचर ऑफ एम्प्लॉयबिलिटी इन द एज ऑफ एआय’ या सत्रात उद्योग नेत्यांनी पुढील तीन ते पाच वर्षांत मोठ्या प्रमाणावर कार्यबल पुनर्रचना होईल; मात्र त्यातून नव्या संधीही निर्माण होतील, असे मत व्यक्त केले. एआयच्या प्रगतीमुळे काही पारंपरिक नोकऱ्या कमी होतील किंवा बदलतील; मात्र डेटा विश्लेषण, एआय मॉडेल ट्रेनिंग, सायबर सुरक्षा, ऑटोमेशन व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत मोठी रोजगारनिर्मिती होणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी बदलत्या गरजेनुसार कौशल्यवृद्धी करणे अत्यावश्यक ठरणार आहे.
इन्फोएजचे संस्थापक संजीव भिकचंदानी यांनी बँकिंग क्षेत्रातील संगणकीकरणाचे उदाहरण दिले. जेव्हा बँकांमध्ये संगणक आले, तेव्हा कुणाची नोकरी गेली नाही, उलट उत्पादकता वाढली, असे ते म्हणाले. एआयच्याही बाबतीत हाच अनुभव येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भिकचंदानी यांनी तरुणांना सल्ला देताना सांगितले, “धोरणांबद्दल चिंता करू नका, स्वतःला असे सक्षम करा की, एआयमुळे तुमची नोकरी जाणार नाही, उलट एआय तुमच्यासाठी नोकरी निर्माण करेल.”
उद्योग नेत्यांनी ‘लाईफ-लाँग लर्निंग’वर विशेष भर दिला. एकाच पदवीवर किंवा कौशल्यावर विसंबून राहण्याचा काळ संपला असून, सतत नवे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. कंपन्याही कर्मचाऱ्यांना पुनःप्रशिक्षणाच्या संधी देत आहेत.
नवी दिल्ली : येथे होत असलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान इंग्लंडकडून तीन महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय एआय उपक्रमांची घोषणा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात विकसनशील देशांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे प्रकल्प राबवले जाणार आहेत. या उपक्रमांना 58 दशलक्ष पाऊंडचा निधी एआयफोरडी कार्यक्रमांतर्गत देण्यात आला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात 2023 मध्ये ब्रिटनमधील बेथले पार्क येथे झालेल्या एआय सुरक्षा परिषदेत करण्यात आली होती. हे प्रकल्प कॅनडाच्या भागीदारीत आशिया आणि आफ्रिकेत राबवले जाणार आहेत.
पहिला उपक्रम म्हणजे एशिया एआयफोरडी ऑर्ब्झव्हेटरी जो दक्षिण व आग्नेय आशियात जबाबदार एआय धोरण आणि नवोपक्रम बळकट करेल.
दुसरा उपक्रम मास्कहेन आफ्रिकन लँग्वेज हब असून, तो 40 आफ्रिकी भाषांमध्ये एआय साधने उपलब्ध करून देणार आहे. याचा लाभ सुमारे 70 कोटी लोकांना होण्याची अपेक्षा आहे.
तिसरा उपक्रम म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ केपटाऊन येथे स्थापन होणारा एआयफोरडी कॉम्यट हब, जो आफ्रिकी संशोधकांना संगणकीय क्षमतेची उपलब्धता वाढवेल.
नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने प्रगती होत असून पुढील तीन वर्षांत या क्षेत्रात ‘हजारपट’ वाढ होईल, असे मत चंडोक यांनी व्यक्त केले. ते राजधानीत आयोजित ‘एआय फॉर डिजास्टर मॅनेजमेंट : अँटिसिपेटरी, हायपरलोकल, स्केलेबल’ या सत्रात बोलत होते. हा कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’ अंतर्गत पार पडला.
चंडोक म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांत एआय मॉडेल्समध्ये झालेला बदल स्पष्ट दिसून येतो. आज आपण पाहत असलेली मॉडेल्स आश्चर्यकारक आहेत. एआयमुळे जग झपाट्याने बदलत असून त्याचा स्वीकारही तितक्याच वेगाने होत आहे.
सध्या एआयचा सर्वात मोठा वापर कोडिंगमध्ये होत असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, सॉफ्टवेअर विकास प्रक्रियेत मोठे परिवर्तन घडत आहे. एआय आता डिजिटल सहकारी म्हणून उद्योगांमध्ये टीममेट बनत आहे. भविष्यातील उद्योग ‘क्लाऊड-फर्स्ट’ नव्हे, तर ‘एआय-फर्स्ट’ असतील, असे ते म्हणाले.
एआयमुळे नोकऱ्या जाणार का, या प्रश्नावर चंडोक म्हणाले की, एआय नोकऱ्या संपवणार नाही; मात्र कामाचे स्वरूप बदलणार आहे. एआय जॉब्स अनबंडल करेल. जर तुम्ही आज एआय शिकत नसाल, तर तुम्ही काहीच शिकत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.
अ ल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, ओपन एआयचे सीईओ सॅम अल्टमेन यांच्यासह जागतिक राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत 20 फेब्रुवारीपर्यंत भारतात आयोजित ‘एआय इम्पॅक्ट समिट’कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. ग्लोबल साऊथमधील ही पहिलीच मोठ्या प्रमाणावर होणारी एआय शिखर परिषद असल्याने भारताच्या जागतिक नेतृत्वाच्या दाव्याला नवी धार मिळाली आहे. आतापर्यंत सुमारे 2.5 लाख नोंदणी झाल्याने या परिषदेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे.
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या अहवालानुसार एआय स्पर्धात्मकतेत भारत तिसऱ्या क्रमांकावर असून, देश आता केवळ प्रेक्षक नसून गंभीर दावेदार ठरत आहे. ‘एआयचे लोकशाहीकरण’ हा या समिटचा मुख्य मुद्दा असून, भविष्यातील तंत्रज्ञान संधींच्या केंद्रस्थानी भारत आणि भारतीय कंपन्यांना स्थान देण्याचा प्रयत्न आहे.
भारताने उभारलेल्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमुळे या दाव्याला भक्कम आधार मिळतो. आधार, यूपीआय आणि इंडियास्टॅक यांसारख्या प्रणालींनी अब्जावधी लोकांचे दैनंदिन जीवन सुलभ केले आहे. आर्थिक समावेशन, सेवा वितरण आणि गळती रोखण्यात या यशस्वी ठरल्या. आता एआय ही शेतीसाठी मार्गदर्शन, आरोग्य तपासणी, वाहतूक आणि सार्वजनिक सेवा मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी या व्यवस्थेची पुढील पायरी ठरू शकते.