

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतराचा पेच मुंबई महापालिकेसमोर उभा आहे. त्यानुसार पालिका प्रशासनाने सुमारे 30 हजार भटक्या कुत्र्यांचे शहराबाहेर स्थलांतर करून तेथे निवारा शेड उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी खासगी संस्थांना देखभालीची जबाबदारी देण्यात येणार असून प्रतिकुत्रा 60 रुपयांपर्यंत देखभाल खर्च देण्याची तयारी दर्शवली आहे.
मुंबई शहरात एक लाखांच्या घरात भटकी कुत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळा, रुग्णालये, रेल्वे स्थानके, बस डेपो, विमानतळ आणि सार्वजनिक उद्याने आदी संवेदनशील सार्वजनिक क्षेत्रांमधून भटक्या कुत्र्यांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबईत काही जागांचा शोध घेण्यात आला. मात्र, अपुऱ्या जागांमुळे शहराबाहेर मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना निवारा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये भटक्या कुत्र्यांचे नवीन सर्वेक्षण करून पुढील दोन महिन्यांत हे स्थलांतरण पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
श्वान निवारा केंद्र चालविण्यासाठी खासगी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन महापालिका प्रशासनानेे केले आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाकडे नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था यासाठी पात्र असणार आहेत. पालिका प्रशासनाकडून कुत्र्यांना आश्रयस्थानांमध्ये पोहोचविण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या आयुष्यभराच्या काळजीची जबाबदारी संस्थेवर असणार आहे.
कुत्र्याच्या वजनानुसार, प्रत्येक कुत्र्यामागे दररोज 10 ते 60 रुपये देखभाल करणाऱ्या संस्थांना देण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे. यासाठी जीपीएस-टॅग केलेले फोटो आणि डिजिटल ॲक्टिव्हिटी लॉग सादर करावे लागणार आहेत.