वाशिम, पुढारी वृत्तसेवा : मानोरा तालुक्यातील (वाशीम) बळीरामनगर येथील शेतकरी साहेबराव बाबाराव सातपुते (वय-४७ वर्षे)(वय-४७) यांनी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतून लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मानोरा पोलीस स्टेशनमध्ये ६ नोव्हेंबर रोजी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
मानोरा तालुक्यातील (वाशीम) बळीरामनगर येथील साहेबराव सातपुते यांची बळीरामनगर शिवारात शेती आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सातपुते यांचा मुलगा साहेबराव सातपुते यांनी खरीप हंगामात पेरणीसाठी पोहरादेवी येथील अकोला जिल्हा को-आँप बँक शाखेतून पीक कर्ज काढले होते. या पीक कर्जावरच त्यांनी पेरणी केली होती; परंतु नेहमीप्रमाणे निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हातातून गेले होते. त्याचबरोबर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे ते नेहमीच पिक कर्ज परतफेड कशी करावी, या चिंतेत ते असायचे.
याच द्विधा मनस्थितीतून साहेबराव सातपुते बळीरामनगर येथून पंचाळा येथे नातेवाईक यांच्याकडे जातो म्हणून घरातून गेले, मात्र त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी पंचाळा फाट्यावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. बळीरामनगर येथील स्मशानभूमीत भाऊबीजेच्या दिवशी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मानोरा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.