Shrinivas Joshi 
पुणे

‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत परवानगी द्या’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने नियमांनुसार मोकळ्या मैदानात होणार्‍या कार्यक्रमांना 25 टक्के प्रेक्षकांच्या मर्यादेचे बंधन घातले आहे. अशा परिस्थितीत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी राज्य सरकारने किमान 50 टक्के उपस्थित राहण्याची परवानगी दिली, तर महोत्सवाच्या आयोजनाचा नक्कीच विचार करता येईल, अशी भूमिका आयोजकांनी घेतली आहे.

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष असून, सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव व्हावा, अशी सर्व शास्त्रीय संगीत रसिकांची इच्छा आहे. आम्ही राज्य सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी सांगितले आहे.

दिग्गजांसह नवोदित गायकांचे, वादकांचे सादरीकरण पाहण्याची संधी रसिकांना मिळते. कोरोनामुळे मागील वर्षी हा महोत्सव होऊ शकला नाही. महोत्सवाला येणार्‍या रसिकांची संख्या पाहता महोत्सवाचे आयोजन करायचे की नाही किंवा कसे करायचे, अशा द्विधा मनस्थितीत आयोजक अडकले होते. महापालिका प्रशासनाकडून मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत स्पष्टता नव्हती आणि जोपर्यंत परवानगी मिळत नाही तोपर्यंत तरी महोत्सवाचे आयोजन करता येणे शक्य नव्हते. परंतु काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण क्षमतेने मैदानात होणार्‍या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाला परवानगी दिली.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करून महोत्सवाला परवानगी दिल्याचे जाहीर केले आणि आयोजकांनीही या निर्णयासंबंधी आनंद व्यक्त करत महोत्सवाच्या आयोजनाविषयी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली. परंतु ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सरकारने मैदानात होणार्‍या कार्यक्रमांना 25 टक्के प्रेक्षकमर्यादेचा नियम लागू केला असून, त्यामुळे महोत्सव होईल की नाही, याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

श्रीनिवास जोशी म्हणाले, 'सध्या राज्य सरकारने घालून दिलेल्या नियमांनुसार मोकळ्या मैदानात होणार्‍या कार्यक्रमांना 25 टक्के प्रेक्षकमर्यादेचे बंधन आहे. अशा परिस्थितीत महोत्सवासाठी राज्य सरकारने किमान 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली, तर महोत्सवाच्या आयोजनाचा नक्कीच विचार करता येईल. आम्ही राज्य सरकारच्या यासंबंधीच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. तसेच याबाबत आम्ही महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचादेखील प्रयत्न करीत आहोत. याबरोबरच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनात महोत्सवाचे स्वरूप, पायाभूत सोयी-सुविधांची उभारणी, कलाकारांची उपलब्धता, त्यांचा प्रवास व निवासव्यवस्था आदी बाबींसाठी लागणारा वेळ याचादेखील विचार करणे गरजेचे आहे,' असे ते म्हणाले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT