पुणे : राज्यातील महायुतीचे सरकार हे भष्ट्राचारात गुंतले असून, कोणाला किती वाटा मिळणार, याकडेच त्यांचे लक्ष आहे. नियोजनशून्य कारभार आणि भष्टाचारामुळे पुण्यात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्मार्ट सिटी, हायपरलूपचे काय झाले? केवळ घोषणा करायच्या, एकही प्रकल्प पूर्ण करायचा नाही. त्यातून केवळ पैसे काढण्याचे काम करीत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचे काम करायचे. चुकीच्या योजना राबवून तिघेही पुण्याची लूट करीत आहेत, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी भाजपवर खरमरीत टीका केली.
पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून वाद सुरू झाला आहे. या वादात आज कॉंग्रेसनेही उडी घेतली. महापालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या ’पुणेकरांचा अधिकारनाम्या’चे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन मेट्रोचे श्रेय घेणाऱ्या भाजपवर सडकून टीका तर केलीच; त्याबरोबचर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांनाही लक्ष्य केले. या वेळी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी सतेज पाटील यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, प्रशांत जगताप, अजित दरेकर आणि शहर युवक अध्यक्ष सौरभ अमराळे उपस्थित होते.
केंद्रांमध्ये कमलनाथ नगरविकासमंत्री असताना त्यांनी पुण्याच्या मेट्रोला परवानगी दिली आणि मी मुख्यमंत्री असताना माझ्याच हस्ते भूमिपूजन झाले, यांची आठवण करून देताना चव्हाण म्हणाले, स्मार्ट सिटी, हायपरलूपचे काय झाले, ते आधी सांगावे. घोषणा करायला पैसे लागत नाही. पुणे शहरात एकही नवीन कंपनी येत नाही. भष्टाचाराला कंटाळल्यामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे असलेल्या कंपन्या शहराबाहेर जात आहेत. या नगरीच्या सर्व पायाभूत सुविधा कोलमडल्या आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे काही दिवसांत पुण्याची अवस्था दिल्लीसारखी होणार आहे. ’जेएनएनयूआरएम’ योजनेच्या माध्यमातून कॉंग्रेसने पुणे शहराला मोठा निधी उपलब्ध करून दिला. कोणी काहीही म्हणत असले, तरी मेट्रो प्रकल्पाची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. या प्रकल्पासाठी मी पाठपुरावा केला. प्रकल्पाची पायाभरणी आम्ही केली. मुंबईनंतर पुण्यात मेट्रो प्रकल्प मंजूर करताना नागपूरला मागे ठेवून चालणार नाही. म्हणून तेथेही मेट्रोला मंजुरी दिली.
सतेज पाटील म्हणाले, सत्तेत असलेले लोक पाण्याबाबत बोलत नाहीत. पुरेशा पाण्यासाठी नागरिकांना एनजीटीमध्ये जावे लागले. भाजपने पुण्याबाबत केवळ घोषणा केल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात ते प्रकल्प पूर्ण झाले नाहीत. ’पुणे फर्स्ट’ हेच आमचे प्रमुख ध्येय राहणार आहे.
महापालिकांसाठी निवडणूक लढविताना कोण किती जागा लढविणार? याबाबत आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत. आघाडी म्हणून निवडणूक लढवीत असताना आम्ही एकमेकांसमोर येणार नाही, याचे नियोजन आम्ही केले आहे. 98 जागी काँग्रेस, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 76 जांगांवर निवडणूक लढवत आहे. आठ ते नऊ जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आहेत. त्याबाबत आज आम्ही निर्णय घेऊ, अशी माहिती अरविंद शिंदे यांनी दिली.
समान पाणीपुरवठा करणार
शहरातील वाहतूक कोंडी सोडविणार
महिलांना पीएमपीचा मोफत प्रवास
678 मिसिंग लिंकरोडची कामे पूर्ण करणार
32 महत्त्वाच्या रस्त्यांची स्थिती सुधारणा करून अतिक्रमणे काढणार
पीएमपीच्या ताफ्यात पाच हजार ईव्ही बसची वाढ करणार
वॉर्डस्तरीय कचरा व्यवस्थापन करणार
कोयता गँगसह गुन्हेगारांचा
बंदोबस्त करू
मालमत्ता करावरील व्याज एक टक्क्यावर आणणार
500 चौरस फुटांपर्यंतची घरे करमुक्त