पुणतांबा : पुणतांबा परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी येथील जुन्या के.टी. वेअरचे आधुनिक ‘व्हर्टिकल बॅरेज’मध्ये रुपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी अंदाजे 40 ते 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, या प्रकल्पामुळे पाणीसाठ्यात 20 टक्क्यांनी वाढ होईल व पाण्याची गळती 100 टक्के थांबेल, असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
पुणतांबा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी विवेक गुंड, उप विभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, प्रथम लोकनियुक्त सरपंच डॉ. धनंजय धनवटे, ग्रामपंचायत सदस्य भूषण वाघ, रामचंद्र पवार, अनिल नळे, गणेशचे माजी संचालक राजेंद्र थोरात, छगन जोगदंड आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दत्तात्रेय झोजे होते. यावेळी ‘राज्य कृषी यांत्रिकीकरण योजने’अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व आधुनिक कृषी अवजारांचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.
मंत्री विखे म्हणाले, गोदावरी कालव्याच्या 100 वर्षांच्या इतिहासात प्रथमच नूतनीकरण व सक्षमीकरणासाठी 400 कोटी रुपयांचा भरीव निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. वितरिका क्रमांक 18 आणि 19 च्या माध्यमातून कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच कोकणातून वाया जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून नगर जिल्ह्यासह संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी 90 हजार कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येत आहे. यातून 85 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातील 55 टीएमसी जायकवाडी, 15 ते 20 टीएमसी भंडारदरा व 15 टीएमसी पाणी मुळा धरणात सोडण्याचे नियोजन आहे.
पुणतांबा येथील गावठाण विस्तार, पाणीपुरवठा योजना व घरकुलांसाठी 22 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली असून, विकासकामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत, असे ही पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी डॉ धनवटे, धनंजय जाधव, अमोल सराळकर, संजय जोगदंड यांची भाषणे झाली, विजय धनवडे यांनी प्रास्ताविक केले.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकासाठी सहकार्य केले जाणार असून, यासाठी लवकरच सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाणार आहे. स्मारकाच्या जागेचा प्रश्न प्रशासकीय स्तरावर तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा जिल्ह्यातील ‘मिलिटरी अपशिंगे’ व नगरमधील घोसपुरी गावांचा आदर्श घेऊन प्रत्येक गावात सैनिकांच्या सन्मानार्थ स्मारके उभारावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शिर्डी एमआयडीसीमध्ये संरक्षण साहित्याचे उत्पादन करणारे ‘हब’ विकसित होत आहे. निबे समूहासारख्या उद्योगांमुळे आणि टाटा समूहाच्या 200 कोटींच्या अद्ययावत प्रशिक्षण केंद्रामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. हरेगाव येथे 17 हजार कोटींच्या गुंतवणुकीतून होणाऱ्या ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ प्रकल्पामुळे 10 हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. तसेच शिर्डी विमानतळ विस्तारीकरणासाठी 700 कोटींचा निधी देण्यात आला असून, एमआरओ सेंटरच्या माध्यमातून 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असेही मंत्री विखे म्हणाले.
शेतकऱ्यांना दिवसा 12 तास अखंडित वीजपुरवठा मिळावा, यासाठी पुणतांबा परिसरात 76 एकर जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असून, यामुळे पुणतांबा, नपावाडी, रामपूरवाडी शिंगवे व पिंपळवाडी या गावांतील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्नही निकाली निघेल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.