झोपडपट्ट्या, संवेदनशील भागात, दाटवस्तीमध्ये राबविणार मोहीम
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टास्कफोर्स नेमणार
राज्यात घुसखोर डिटेन्शन सेंटर
घुसखोरांना पकडल्यानंतर त्यांना ठेवण्यासाठी राज्यात कायमस्वरूपी डिटेन्शन सेंटर नसल्यामुळे मागील काही वर्षांत अडचणी येत होत्या. आता 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि वर्क ऑर्डरही देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच पहिले डिटेन्शन सेंटर लवकरच उभारले जाणार असल्याचे राज्यमंत्री कदम म्हणाले.
2021 109 हद्दपार
2022 77 हद्दपार
2023 127 हद्दपार
2024 202 हद्दपार
2025 2,376 + हद्दपार
मुंबईत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पांवर मजूर म्हणून बांगलादेशी घुसखोर आढळल्याची धक्कादायक माहिती राज्यमंत्री कदम यांनी दिली.या बांधकाम प्रकल्पांसाठी एक एसओपी तयार केली जात असून त्यानुसार सर्व शासकीय व खासगी प्रकल्पांतील कंत्राटदारांना तेथे काम करीत असलेल्या कामगारांची संपूर्ण माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही माहिती न दिल्यास कंत्राटदारांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. या कारवाईमुळे बांधकाम क्षेत्रातील अवैध मजुरांचे प्रमाण 60-70 टक्क्यांनी घटल्याचा दावाही कदम यांनी केला.
मुंबई : बांगलादेशी घुसखोरांची वाढत्या संख्या लक्षात घेऊन मुंबईसह राज्यभरात लवकरच कोम्बिंग ऑपरेशन राबविले जाणार असून झोपडपट्ट्या, प्रकल्पग्रस्त इमारती, संवेदनशील परिसर आणि दाटवस्त्यांमध्ये हे कोम्बिंग ऑपरेशन हाती घेतले जाणार आहे. त्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली टास्कफोर्स नेमण्याची घोषणा गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शनिवारी विधान परिषदेत केली.
अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधातील कारवाईत महाराष्ट्र देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अग्रस्थानी आहे आणि ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे, असेही राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी बांगलादेशी घुसखोरांच्या प्रश्नावर मांडलेल्या लक्षवेधीवर शनिवारी प्रदीर्घ चर्चा झाली. सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील आमदारांनी सरकारला धारेवर धरत घुसखोरांविरोधात ठोस कारवाईची मागणी केली. या चर्चेत शशिकांत शिंदे,संजय केणेकर,चित्रा वाघ,अनिल परब, मनीषा कायंदे, निरंजन डावखरे, उमा खापरे यांनी सहभाग घेऊन विविध प्रश्न उपस्थित केले.
या प्रश्नांना उत्तरे देताना राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, भारतात व महाराष्ट्रात येणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात केंद्र व राज्य सरकार संयुक्त कारवाई करत आहे. गेल्या वर्षभरात दोन हजारांहून अधिक घुसखोरांना देशाबाहेर पाठवण्यात आले. आता केंद्र शासनाने काढलेल्या नव्या परिपत्रकानुसार, संबंधित व्यक्ती अवैध बांगलादेशी असल्याचे पुरावे उपलब्ध असल्यास प्रथम गुन्हा दाखल करून न्यायप्रक्रिया पूर्ण करण्याची सक्ती नाही; त्यांना थेट हद्दपार करण्याची प्रक्रिया राबवता येते. त्यामुळे या हकालपट्टीच्या कारवाईचा वेग वाढला आहे.
बहुतांश घुसखोरी पश्चिम बंगालमार्गे होत असल्याचे आढळले आहे. तेथे तयार झालेल्या कागदपत्रांच्या आधारे हे घुसखोर इतर राज्यांत स्थलांतर करतात. त्यामुळे सीमा भागात केंद्र सरकार व सीमा सुरक्षा दलामार्फत कडक उपाययोजना केल्या जात आहेत. बांगलादेशी घुसखोरांवरील कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्यात पाच जणांचे एक विशेष पथक स्थापन केले असून, ही पथके अवैध स्थलांतरितांविरोधात कारवाई करत आहेत. अँटी टेररिझम स्क्वॉड व गुप्तचर यंत्रणांच्या मदतीनेही संयुक्त मोहीम राबवली जात असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी सांगितले.
आवश्यक तेथे कोम्बिंग ऑपरेशन करू. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करू. जिथे दाट वस्ती आहे, तिथे बांगलादेशी घर करतात, विशेषता प्रकल्पग्रस्त पुनर्वसन प्रकल्प व एसआरएसारख्या प्रकल्पांच्याही चौकशीचे आदेश देत असल्याचे राज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई करत आहेत. कारवाईदरम्यान संबंधितांची कागदपत्रे तपासून माहिती नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही कारवाई सूडबुद्धीने नव्हे, तर कायद्याच्या चौकटीत केली जात असून यापुढेही ही मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला.
मुंबई : मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशी घुसखोर शिरकाव करत आहेत. हा शिरकाव केवळ वस्त्यांपुरता नाही. व्यवसाय, पदपथांवरही बांगलादेशी घुसताना दिसतात. मुंबई शहरातील 61 भागांत केलेल्या पाहणीनुसार बांगलादेश व म्यानमार येथून आलेले सुमारे 3014 स्थलांतरित भारतीय ओळखपत्रांसह आढळून आले. काहींनी हे दस्तऐवज एजंटकडून 7 हजार ते 30 हजार रुपये दराने मिळवले, अशी भीषण वस्तुस्थिती भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेतून मांडली.
मुंबईतील 70 टक्के अवैध मुस्लिमांकडे आधार कार्डसारखी कागदपत्रे असल्याचे टाटा सामाजिक संशोधन संस्थेच्या म्हणजेच टीसच्या अहवालात आढळून आले. हद्दपार केलेली बांगलादेशी महिला सहा महिन्यांनंतर पुन्हा अवैध प्रवेश करून मुंबईत आढळली, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले.
मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट डॉक्टरांनी 237 बोगस जन्मदाखले बांगलादेशींना दिले, याप्रकरणाची आठवण करून देत प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबईतून मराठी व हिंदू बाहेर काढला जात असून विशिष्ट समुदायाचेच लोक झोपड्या बांधून वस्त्या वाढवताना दिसत आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात पात्र झोपडीधारकांना घरे दिली जातात. दलालांच्या माध्यमातून मोठी रक्कम घेऊन अपात्र लोकांना पात्र केले जाते. अनेक हिंदू कुटुंबांना अपात्र ठरवले जाते. गेल्या पाच वर्षांत प्रत्येक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत पात्र केलेल्या लाभार्थ्यांची यादी एसआरएने प्रकाशित करावी. यातील सुनियोजित जिहाद लक्षात येईल.
मुंबईतील सर्व उपनगरांत असलेल्या फेरीवाल्यांची तपासणी केली तर काही हजारांत बांगलादेशी फेरीवाले दिसून येतील. त्यांच्याकडे बोगस आधार कार्ड दिसतील. मुंबई उद्ध्वस्त करून ताब्यात घ्यायची, सामाजिक लोकसंख्या बदलून एका विशिष्ट समाजाची लोकसंख्या वाढवण्याचा हा पूर्वनियोजित घाट आहे, असा आरोपही दरेकर यांनी केला.
मुंबईतील सर्व पदपथांवरील फेरीवाले, मुंबईतील उत्तन दर्गा, माहीम-वसई किल्ला, डोंगरी किल्ला, चेंबूर चित्ता कॅम्प, वर्सोवा मालवणी, मच्छी मार्केट, एसआरए प्रकल्पातील लाभार्थी या सर्व ठिकाणी अवैध बांगलादेशी मुस्लिमांना शोधून काढण्यासाठी कोणती शोधमोहीम शासन हाती घेणार आहे, असा थेट प्रश्न दरेकर यांनी केला. बांगलादेशी घुसखोरांना शोधण्यासाठी मुंबई पोलीस दलामध्ये स्वतंत्र विभागाची निर्मिती करणार का? या विभागाला आयपीएस अधिकारी व सर्व प्रकारचे मोठे संख्याबळ असलेले कर्मचारी, पोलीस अधिकारी व सुसज्ज अशी यंत्रणा उपलब्ध करून देणार का? यासाठी वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन करा. देशाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा विषय आहे. एसआरए व प्रकल्पग्रस्तांच्या घरांसाठी उभारलेल्या प्रकल्पांतही घुसखोरी सुरू आहे. अशा पीएपीमधील सर्व याद्या तपासा, त्याची चौकशी करा. दलालांचा शोध घेऊन कोम्बिंग ऑपरेशनचा निर्णय घेणार का? त्यासाठी स्वतंत्र तपास पथक तयार करणार का, असे अनेक प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी आपल्या लक्षवेधीत उपस्थित केले.