कुरुंदवाड (कोल्हापूर); पुढारी वृत्तसेवा: कोल्हापूरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने कृष्णा-पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. यामुळे कृष्णा-पंचगंगा नदीवरील शिरोळ तालुक्यातील तेरवाड व शिरोळ बंधारा पाण्याखाली गेला आहे. तर कृष्णा-पंचगंगेच्या नदीवर असणारा राजापूर बंधारा देखील पाण्याखाली गेला आहे.
मंगळवारी (दि.७) रोजी रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा-पंचगंगेच्या पाणी पातळीत झफाट्याने वाढ होत गेली. यामुळे शिरोळ तालुक्यातील तेरवाड बंधारा, राजापूर बंधारा आणि राजापूर बंधारा पाण्याखाली गेला.
याच दरम्यान परिसरातील अनेक गावांत पुराचे पाणी शिरले. तसेच पुराच्या पाण्याने आजूबाजूच्या परिसरातील ऊस आणि आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तर परिसरात उगवलेले कापणीला आलेला वैरण (गवत) पाण्याखाली गेले आहे.
याच दरम्यान तेरवाड बंधारा येथे पंचगंगा नदी पलीकडे शिरढोण येथील शेतात कामासाठी दोन महिला गेल्या होत्या. त्या संध्याकाळी काम संपवून तेरवाड येथून आपल्या गावी परतून येत असताना या बंधाऱ्यावरून जीव धोक्यात घालून येत होत्या. शीला बाबासो चौगुले आणि शोभा गिरणी दोन महिलांची नावे आहेत.
अशी जीवघेणी वाहतूक येथे काही लोक करत असतात अशी चर्चा नागरिकांतून होत असून याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे म्हटले आहे. या दरम्यान महिला बंधारा पार करत असताना मासेमारी करण्यासाठी आलेल्या भोई समाजाच्या काही लोकांनी त्यांना नदीपलीकडे आणून सोडले. यानंतर त्या महिलांना तुम्हाला जीव नको झाला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले.
महिन्याभरापूर्वी झालेल्या महापुराने शेतकरी पुरता घायाळ झाला आहे. महापुरात वैरण संपूर्ण नष्ट झाल्याने नदीकडील गवते वैरण म्हणून पर्याय होती. मात्र, पुन्हा पाणी पातळीत वाढ झाल्याने ही वैरण पाण्याखाली गेली आहे. यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसाने पुन्हा डोकेवर काढल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
हेही वाचलंत का?