नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: १२ ते १७ वयोगटातील मुलांचे १ ऑक्टोंबरपासून लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात व्याधीग्रस्त मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
देशभरात सध्या १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.
आत्तापर्यंत देशातील ८० कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आल्याचा दावा केला जात आहे.
देशात १८ वर्षांखालील मुलांची संख्या सुमारे ४४ कोटी आहे.
त्यातील १२ ते १७ या वयोगटातील मुलांना प्राधान्याने लस देण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.
इन्सॅकॉग आणि कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष प्रा. एन. के अरोरा यांनी सांगितले की,
या वयोगटातील मुलांद्वारे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली जाईल.
लहान मुलांमध्ये कोरोनाचा फारसा संसर्ग झाला नसल्याचे आतापर्यंतच्या सिरो सर्व्हेमधून आढळून आले आहे.
मात्र प्रौंढातील मोठ्या वर्गाचे लसीकरण झाले असल्याने १२ ते १७ या वयांच्या मुलांना आधी लस देण्याचा मानस आहे.
पहिल्या टप्प्यात व्याधीग्रस्त मुलांना आधी लस देण्यात येईल, असे प्रा. अरोरा म्हणाले.
एरवीही लहान मुलांमध्ये मोठे आजार व त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमीच असते.
त्यामुळे त्यांच्याऐवजी पालकांच्या सुरक्षिततेकडे आधी लक्ष देण्यात आले. सध्या प्रौढांचे लसीकरण वेगाने सुरू आहे.
त्यामुळे मुलांचे लसीकरण करण्याबाबत सरकार विचार करत आहे.
देशात १२ ते १७ या वयोगटातील सुमारे १२ कोटी मुले असून, त्यातील जेमतेम १ टक्का मुले व्याधीग्रस्त आहेत. ही संख्या सुमारे ४० लाख असावी, असा सरकारचा अंदाज आहे. त्यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मोफत लस देण्यास सुरुवात होईल. औषध महानियंत्रकांनी झायडस कॅडिलाच्या झायकोव-डी लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ही लस भारतातील मुलांना दिली जाईल.
पहिल्या टप्प्यात देशभरात लसीच्या पुरवठ्यावरून मोठा गोंधळ उडला होता. माजी आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यावर लसीच्या वाटपात पक्षपात केल्याचा आरोप केला होता. त्याचे चटके थेट केंद्र सरकारला बसले. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात हर्षवर्धन यांच्या जागी मनसुख मांडविया यांच्याकडे आरोग्यमंत्रीपदाचा कार्यभार दिला. मांडविया यांनी सूत्रे घेतल्यानंतर लसीकरणाला वेग आला आहे.
हेही वाचा :