नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्र लिहिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये हे पत्र जसेच्या तसे छापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटील यांना पुढील चार दिवसांत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचा इशारा दिला आहे. लोक ५० कोटी, १०० कोटींचा दावा दाखल करतात. मी चंद्रकांत पाटील यांच्यावर सव्वा रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरुन राज्य सरकारवर हल्लाबोल केला. यामुळे महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. याच दरम्यान चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याबाबत सामनात अग्रलेख आला होता. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पत्र लिहित उत्तर दिलं होतं.
चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला जे पत्र लिहिलं होतं; ते सामनाच्या संपादकीयमध्ये जसेच्या तसे छापण्यात आलं आहे.
तुम्ही माझ्यावर अग्रलेखात बरीच चिखलफेक केली आहे. पण तुम्हाला मी जाब देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही. म्हणजे राजकीयदृष्ट्या बरोबरी नाही, अशा अर्थाने शब्द वापरला. नुकतेच मी एका नेत्याबद्दल पाठीत खंजीर खुपसला, असा वाक्यप्रचार वापरला तर तुम्ही पाठीत खंजीर खुपसल्याचा पुरावा मागितला. पाठीत खंजीर खुपसणे म्हणजे विश्वासघात करणे एवढाही अर्थ तुम्हाला संपादक असून माहित नाही. त्यामुळे प्रोटोकॉल शब्द का वापरला हे सांगितले. विशेष म्हणजे तुमच्या पक्षाचे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनीही हाच वाक्यप्रचार वापरला. मी हा वाक्यप्रचार वापरल्यानंतर तुमच्या पक्षातील लोकांचे धाडस वाढलेले दिसते.
मी तुम्हाला उत्तर देणे प्रोटोकॉलनुसार योग्य नाही, असे म्हणण्याचे कारण की, मी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी पत्रातून केली होती.
चंद्रकांतदादांनी 'सामना'च्या अग्रलेखावर व्यक्त केलेली प्रतिक्रिया वाचून काय वाटेल याचे उत्तर रुपाली चाकणकर यांनी आधी दिले आहे. त्या म्हणतात, "चंद्रकांतदाद पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणाला पडलेले एक गोड स्वप्न आहे. कारण त्यांच्यामुळे महाराष्ट्रात सध्या निखळ मनोरंजन होत आहे. सरकारने चंद्रकांतदादांवर करमणूक कर लावावा", असे शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.
आता संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना राजकीय संघर्ष चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
१२ आमदारांच्या नियुक्तीच्या मुद्यावरुनही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. राज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती का रखडवली हे भाजपनं सांगावं. राज्यपालांना स्वाक्षरी करण्याचा प्रॉब्लेमच आहे. राज्यपाल आपल्या पदाचं अवमुल्यन करत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
आम्हाला कायदा- सुव्यवस्था शिकवू नका, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपला टोला लगावला आहे. गुजरातमध्ये ड्रग्ज सापडले हे फार गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.