मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खान (Twist In Aryan Khan Case: ) याची सुटका करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (एनसीबी)२५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातील आठ कोटी रुपये हे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गौप्यस्फोट ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केला आहे. दरम्यान, हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी याचा आर्यन खानबरोबरील सेल्फी व्हायरल झाला होता. प्रभाकर साईल हा केपी गोस्वामी यांचा बॉडीगार्ड होता. एक प्रतिज्ञापत्र सादर करत त्याने समीर वानखेडे आणि केपी गोसावी या दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत.
साईल याने म्हटलं आहे की, जीवाला धोका होता म्हणून आजपर्यंत याप्रकरणी काहीच बोललो नाही. यावेळी आर्यन खानला एनसीबीने पकडले होते. मी केपी गोसावी यांच्याबराेबरच हाेताे. या वेळी मला पंच म्हणून बोलविण्यात आले. मला कोर्या कागदावर सही करण्यास सांगितले. मी म्हटलं कोर्या कागदावर सही कशी करणार, अशी विचारणाही केली. काहीही हाेत नाही, असे सांगत समीर वानखेडे यांनी माझी कोर्या कागदावर सही घेतली. यानंतर या कागदावर काय लिहिण्यात आले याची मला माहिती नाही, असेही साईल याने म्हटले आहे.
आर्यन खानला पकडल्यानंतर २५ कोटींची मागणी कर आणि डील १८ कोटीला फायनल कर, असा फोन किरण गोसावींनी सॅम नावाच्या व्यक्तीला केला हाेता. त्याने मध्यस्थामार्फत २५ कोटी मागितले. यातील ८ कोटी रुपये हे समीर वानखेडे यांनाच द्यावे लागतील , असे गोसावी याने त्यावेळी सांगितले हाेते, असेही प्रभाकर साईल याने म्हटलं आहे.
ड्रग्ज प्रकरणी कारवाई झाल्यानंतर मी घरी गेलाे. थोड्यावेळानंतर गोसावी यांचा मला फोन आला. ५० लाख रुपये एका ठिकाणाहून घेवून आणण्यास सांगितले. मी ५० लाखांची रोकड दोन बॅगमधून घेवून आलो. सॅम आणि गोसवी याच्यात पैशावरुन चर्चा झाली. क्रूजवर छापा टाकल्यानंतर शाहरुख खान याची मॅनेजर पूजा दादलानी हीला भेटण्यासाठी केपी गोसावी आणि सॅम हे निळ्या रंगाच्या कारमधून गेले. त्यांनी १५ मिनिटे चर्चा केली हाेती, असाही दावा साईल याने केला आहे.
मला राहत घर नाही, त्यामुळे मी गोसावी यांच्याकडेच चालक म्हणून काम करतो होतो. मी सोलापूरला गेलो होतो. तेव्हा पोलिस माझ्या कुटुंबीयांकडे गेले होते. मी प्रचंड घाबरलो होते. माझ्या जीवाला धोका होता म्हणून याप्रकरणी खुलासा केला नव्हता, असा दावाही साईल याने केला आहे.
एनसीबीवर करण्यात आलेले सर्व आरोप निराधार आहेत. याला उत्तर देण्यात येईल, असे समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.