मुंबई; पुढारी वृतसेवा
अहंकाराने ग्रासलेल्या ठाकरे सरकार विरोधात कोणीही बोलले, भ्रष्टाचार उघड करु लागले की, मग सत्तेचा आणि पोलीस दलाचा गैरवापर कसा केला जातो हे गेली दोन वर्षे जनता पाहत आहे. मी जे बोललोच नाही, आणि जे बोललो त्याचा विपर्यास करुन जो बागुलबुवा उभा केला आहे, त्या विरोधात माझी बाजू सक्षमपणे न्यायालयात मांडेन, सत्य समोर येईलच, सरकारच्या नाकर्तेपणाविरोधातकडवा संघर्ष करेन असे भाजपा नेते आमदार अँड. आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
महिलांचा अपमान करणे हा माझा स्वभाव नाही, तसा आमचा संस्कारही नाही. मा. महापौर किशोरीताई पेडणेकर यांचा आणि माझा गेले अनेक वर्षांचा स्नेह असून आम्ही नगरसेवक म्हणून एकत्रित काम केले आहे. महापालिका सभागृहात मुंबईकरांच्या विषयावर अनेक वेळा कडवा संघर्षही झाला, पण कटूता, अपमान असे कधी घडले नाही. त्यामुळे आता त्यांच्याबाबत जे खोटे चित्र उभे केले गेले आहे ते त्यांनाही पटणार नाही, अशी माझी धारणा आहे. या मागचा बोलविता धनी कोण? याची कल्पना मला आहे.
ज्या पत्रकार परिषदेवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ आजही युट्युबवर उपलब्ध आहे. त्यातील सत्य, जे सत्ताधारी पक्षाला बघायचे नसले तरी ते न्यायालयासमोर आम्ही मांडू. माझा न्याय व्यवसस्थेवर विश्वास आहे. सत्य समोर येईलच असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
तसेच ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आम्ही मांडला म्हणून विधानसभेतून निलंबित केले गेले. महापालिका यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे दुर्दैवाने मृत्यू झालेल्या वरळीतील चिमुरड्याच्या मृत्यूचा जाब सत्ताधीशांच्या विचारला, कोष्टल रोड मधील भ्रष्टाचार उघड केला, ममतादिदीं सोबतच्या बैठकीतील ठाकरे सरकारचा महाराष्ट्र विरोधातील छुपा अजेंडा उघड केला म्हणून आता असे खोटे गुन्हे दाखल करुन जर मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर मग यापुढे अजून जोरात प्रश्न मांडेन. विरोधीपक्षाचा आमदार म्हणून मुंबईकरांचे प्रश्न मांडणे हा जर गुन्हा असेल तर मग तो शंभरवेळा आम्ही करु.
माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत आंदोलन सोडून हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. तो खोट्या कुटनितीवर असल्याने या असत्य आणि खोट्याच्या विरोधात संघर्ष करायला डगमगणार नाही, अशा असनदशीर दमदाटीला, दडपशाहीला घाबरणार नाही आणि जनसेवेचा घेतला वसा टाकणार नाही असेही त्यांनी म्हटले.
तर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या विरोधात आपण अवमानकारक बोललोच नाही, असे स्पष्टीकरण मा. खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी दिले आहे. ही त्यांची भूमिका आमचे यश असले तरी यावरुन जाब विचारला म्हणून आम्हालाच दोषी ठरविले जाते आहे. त्याचेही योग्य उत्तर सनदशीर मार्गाने आम्ही देऊच. आम्ही ठाकरे सरकारसारखे असनदशीर वागत, नाही आणि वागणार नाही. असेही अँड आशिष शेलार म्हणाले.
हेही वाचलंत का?