प्रतीकात्मक छायाचित्र  AI-generated image
आरोग्य

Meal Timing & Mental Health| सावधान! अवेळी जेवण ठरू शकतं 'या' गंभीर मानसिक आजाराचे कारण; नवीन रिसर्च काय सांगतो?

Meal Timing & Mental Health| खाण्याच्या वेळाचा होता मानसिक स्थितीवरही मोठा परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Meal Timing & Mental Health

आजच्या धावपळीच्या युगात कामाच्या नादात जेवणाची वेळ चुकणे किंवा थेट जेवणच टाळणे ही अगदी सामान्य गोष्ट झाली आहे. पण, जर तुम्हीही असं करत असाल तर वेळीच सावध व्हा! तुमची ही सवय केवळ पोटाचे विकारच नाही, तर थेट तुमच्या मानसिक आरोग्यावरही घाला घालत असल्याचं एका नव्या संशोधनातून समोर आलं आहे.

अनियमित खाण्याच्या सवयींचा थेट संबंध नैराश्याशी

'जर्नल ऑफ अफेक्टिव्ह डिसऑर्डर्स' या नामांकित वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यास्यानुसार, जेवणाच्या वेळा निश्चित नसणे आणि अनियमित खाण्याच्या सवयींचा थेट संबंध नैराश्याच्या (Depression) वाढत्या धोक्याशी आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा आपल्या शरीराच्या अंतर्गत चक्रासोबतच मानसिक स्थितीवरही मोठा परिणाम करतात, त्यामुळे मानसिकदृष्ट्या फिट आणि आनंदी राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणे पुरेसे नाही, तर तो रोज योग्य वेळी घेणेही तितकेच गरजेचे आहे.

२१,५६८ प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण

कोरिया सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनने गोळा केलेल्या २०१४-२०२२ च्या कोरिया नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्वेमधील २१,५६८ प्रौढांच्या डेटाचे विश्लेषण करून, कोरियन संशोधकांनी जेवणाची अनियमता आणि आणि मानसिक स्वास्थ्य यांच्यातील संबंधावर प्रकाशझोत टाकला आहे.

अवेळी जेवणाचा परिणाम मानसिक आरोग्‍यावरही

यापूर्वी झालेल्या संशोधनांमधून असं समोर आलं आहे की, जेवणाच्या अनियमित सवयींमुळे लठ्ठपणा, मधुमेह (इन्सुलिन रेझिस्टन्स) आणि हृदयविकारासारख्या गंभीर शारीरिक समस्यांचा धोका वाढतो. मात्र,नवीन अभ्यासात यापेक्षाही अधिक धक्कादायक खुलासा झाला आहे. या संशोधनानुसार, जे लोक रोज ठरलेल्या वेळी मुख्य जेवण (दुपारचे आणि रात्रीचे जेवण) करत नाहीत, त्यांच्यामध्ये वेळेवर जेवणाऱ्यांच्या तुलनेत नैराश्य (डिप्रेशन) येण्याची शक्यता तब्बल ५५ टक्क्यांनी जास्त असते. यात दिलासादायक बाब म्हणजे, जर तुमच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या सकस पदार्थांचा समावेश असेल, तर या अवेळी खाण्याचे दुष्परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतात. पण या उलट, जर तुम्ही रोज सकाळी वेळेवर नाश्ता करणे टाळत असाल, तर मात्र अवेळी खाण्याचे हे दुष्परिणाम अधिकच तीव्र आणि घातक ठरतात.

अवेळी जेवल्‍याने शरीरावर नेमका कोणता परिणाम होतो?

संशोधकांच्या मते, जेवणाच्या अनियमित वेळांमुळे आपल्या शरीराचे जैविक घड्याळ ( 'सर्केडियन रिदम') बिघडते. शरीराचे जैविक घड्याळ पचनक्रिया नियंत्रित करत असते. हे अंतर्गत चक्र बिघडल्यामुळे थेट आपल्या मूडवर नियंत्रण ठेवणाऱ्या जनुकांवरच याचा परिणाम होतो. मेलाटोनिन व कॉर्टिसोल सारख्या महत्त्वाच्या हार्मोन्सचे संतुलन बिघडते. या हार्मोनल बदलांमुळे माणसाचे स्वतःच्या भावनांवरील नियंत्रण सुटू लागते, मनःस्थितीत सतत चढ-उतार होतात आणि मानसिक ताण सहन करण्याची ताकद कमी होते. याशिवाय, अवेळी खाणाऱ्या लोकांच्या आहारात अनेकदा मूड चांगला ठेवण्यासाठी आवश्यक असणारी बी जीवनसत्त्वे (B vitamins), फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे कमी पडतात, यामुळे मानसिक आरोग्य अधिकच खालावते, असेही या संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे.

नैराश्‍यामुळेही जेवणाच्‍या वेळेत होतो बदल

मानसिक दृष्टिकोनातून विचार केला तर, जेवणाची वेळ निश्चित नसणे हे तुमच्या विस्कळीत झालेल्या दिनचर्येचे लक्षण असू शकते. अनेकदा नैराश्यामुळे लोक लोकांपासून किंवा समाजापासून दूर जाऊ लागतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर होतो. त्यामुळे अवेळी जेवण हे केवळ शरीराचे जैविक चक्रच बिघडवत नाही, तर ते माणूस मानसिक तणावात असल्याचा एक मोठा संकेतही असू शकतो, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

आधी नक्की काय होतं? नैराश्य की अवेळी जेवण?

या संशोधनाला काही मर्यादा देखील आहेत. जेवणाची वेळ चुकल्यामुळे नैराश्य येते, की नैराश्यात असल्यामुळे माणूस अवेळी जेवू लागतो, म्हणजेच या दोन्हीपैकी नेमकी सुरुवात कशाने होते, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. हा परस्पर संबंध नेमका कसा काम करतो, हे शोधण्यासाठी अजून मोठ्या प्रमाणावर संशोधनाची गरज आहे.

जगभरात मानसिक आजारांचा विळखा वाढला

आज जगभरात १ अब्जाहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येचा सामना करत आहेत आणि भविष्यात हा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. यामध्ये 'नैराश्य' (डिप्रेशन) आणि 'चिंता' (अँझायटी) हे पुरुष आणि महिला दोघांमध्येही आढळणारे सर्वात मोठे मानसिक आजार ठरत आहेत. वाढत्या धोक्यामुळेच आता डॉक्टर आणि शास्त्रज्ञ औषधोपचारांशिवाय जीवनशैलीत कोणते बदल करून हे आजार रोखता येतील, यावर अधिक संशोधन करत आहेत. आहाराच्या सवयींचा नैराश्याशी थेट संबंध असल्याचे आता अनेक पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.

नैराश्याचा धोका कमी करण्‍यासाठी वेळेवर जेवणे महत्त्‍वाचे

नवीन संशोधनातून एक व्यावहारिक आणि सोपा मार्ग समोर आला आहे. आपल्याला नैराश्याचा धोका टाळायचा असेल, तर महागड्या औषधांशिवाय आपण आपल्या सवयींमध्ये बदल करू शकतो. रोज ठरलेल्या वेळी जेवणे, आहारात वेगवेगळ्या सकस पदार्थांचा समावेश करणे आणि सकाळी वेळेवर नाश्ता करणे, या साध्या सवयी देखील तुमचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतात, हेच नवीन संशोधनात स्‍पष्‍ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT