तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला
दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : आंबेली माणगावकरवाडी येथे तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला. ही घटना आज (दि.१०) सकाळी घडली. येथील शेतकरी वृंदावन गवस यांनी याची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क साधून तिलारी धरणाचा डावा कालवा फुटला असल्याची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ पाणी बंद करण्यात आले.
ही घटना घडून अनेक तासांचा कालावधी उलटला तरी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते. या दुर्घटनेत किती नुकसान झाले असावे याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. वारंवार फुटणाऱ्या या कालव्यांमुळे पाटबंधारे विभागाचा हलगर्जीपणा व अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या कालव्यांची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.