Niteh Rane : ‘एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’ | पुढारी

Niteh Rane : 'एखादा पेंग्विन कमी पाळा, पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा'

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबईतील रस्त्यांवरील खड्‌ड्यांवरून भाजप आमदार नितेश राणे (Niteh Rane) यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना पत्र लिहून खोचक शब्दात टोला लगावला आहे. एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा असा टोला लगावला आहे.

नीतेश राणे (Niteh Rane) यांनी महापौरांना पत्र लिहून चांगलाच समाचार घेतला आहे. २२ हजार कोटी खर्च करून रस्ते नीट होत नसल्याने हा पैसा खड्ड्यात घातला की कंत्राटदाराच्या घशात ? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

काय म्हटले आहे पत्रात?

गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरानी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे.

२२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत.

आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय ‘एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’.

आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कॉंट्रक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो.

महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत

महानगर पालिकेतील सत्ताधारी सेना जर काँट्रॅक्टरधार्जीणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाहीने मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पुर्ण अधिकार आहे. पंरतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही काँट्रॅक्टरच्या संगनमताने सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय ?

सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊलं उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावरती उतरू.

हे ही वाचलं का?

Back to top button