

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. या परिक्षेला देशातील लोक सामान्य भाषेत आयएएस परीक्षा असेही म्हणतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात. पण काहीजणच ही परीक्षा पास होतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की एका टीम इंडियाच्या क्रिकेटरनं यूपीएससी परिक्षेत यश मिळवले आहे.
अमय खुरासिया असे त्याचे नाव आहे. क्रिकेटमध्ये करियर करण्यापूर्वी तो यूपीएससी परीक्षा पास झाला होता. अमयचा जन्म १९७२ चा. तो मध्य प्रदेशचा आहे. सध्या तो कस्टम्स आणि एक्साइज डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे.
अमयनं वयाच्या अवघ्या १७ वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. भारताकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यापूर्वी त्याने यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती.
अमेयनं १९९९ मध्ये टीम इंडिया संघात पदार्पण केले. त्याने श्रीलंका विरुद्ध पेप्सी कपचा पहिला सामना खेळला. त्याने पहिल्याच सामन्यात ४५ चेंडूत ५७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमक दाखवता आली नाही. आणि काही वर्षांतच त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकीर्द संपली.
अमय खुरासियाने भारताकडून १२ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याला केवळ १४९ धावा करता आल्या. तो आपला शेवटचा सामना श्रीलंके विरुद्ध २००१ मध्ये खेळला.
डावखुरा फलंदाज असलेल्या अमयने ११९ फर्स्ट क्लास सामने खेळले आहेत. त्यात त्याने ७३०४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर २१ शतके आणि ३१ अर्धशतके आहेत. त्याशिवाय अमयने ११२ लिस्ट ए सामन्यात ३७३८ धावा केल्या. ३८ च्या सरासरीने त्याने ४ शतके आणि २६ अर्धशतके केली आहेत.