जागतिक पर्यावरण दिन विशेष : प्लास्टिकचा अतिरेकी वापर ठरतोय चिंतेचा विषय

जागतिक पर्यावरण दिन विशेष : प्लास्टिकचा अतिरेकी वापर ठरतोय चिंतेचा विषय
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे : प्लास्टिकचा अतिरेकी वापर आणि त्यापासून मुक्ती हा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. प्लास्टिक पृथ्वीवरील प्राण्यांसाठी एक प्रमुख चिंतेचा विषय होत आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे. आपण काय खातो आणि अन्न कसे
तयार करतो, याचा पर्यावरणावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. यावर उपाय म्हणून सरकारबरोबरच सर्वसामान्यांनीही घनकचरा व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.

'प्लास्टिक प्रदूषणावर उपाय' थीम

पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी जागतिक पर्यावरणदिन 5 जूनला साजरा केला जातो. 'प्लास्टिक प्रदूषणावर उपाय' या थीमखाली हा दिवस साजरा होत असून, 2023 मध्ये जागतिक पर्यावरण दिनाचे 50 वे वर्ष आहे.

23 दशलक्ष टन प्लास्टिक पाण्यात

जगभरात दर वर्षी 430 दशलक्ष टनांहून अधिक प्लास्टिक तयार केले जाते, त्यापैकी निम्मे प्लास्टिक फक्त एकदाच वापरण्यासाठी डिझाइन केले जाते. त्यातील 10 टक्क्यांपेक्षा कमी प्लास्टिकचा पुनर्वापर केला जातो. अंदाजे 19-23 दशलक्ष टन दर वर्षी तलाव, नद्या आणि महासागरांमध्ये मिसळते. मायक्रोप्लास्टिक्स – 5 मिमी व्यासापर्यंतचे छोटे प्लास्टिकचे कण – अन्न, पाणी आणि हवेत मिसळतात. ग्रहावरील प्रत्येक व्यक्ती वर्षाला 50 हजारांपेक्षा जास्त प्लास्टिकचे कण श्वासाद्वारे ग्रहण करीत असल्याचा अंदाज आहे. फेकून दिलेले किंवा जाळलेले एकदा वापरलेले प्लास्टिक मानवी आरोग्य आणि जैवविविधतेला हानी पोहोचवते आणि पर्वताच्या शिखरापासून समुद्राच्या तळापर्यंत प्रत्येक परिसंस्थेला प्रदूषित करते.

40 कोटी मेट्रिक टन उत्पादन

प्लास्टिकचा परिणाम वन्यजीवांवर, विशेषत: सागरी प्रजाती आणि परिसंस्थेवर होतो. शतकाच्या सुरुवातीपासून (सन 2000), जगभरात उत्पादित प्लास्टिकचे प्रमाण दुप्पट झाले आहे, जे 2021 मध्ये वार्षिक सुमारे 40 कोटी मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे.

प्लास्टिक वापराबाबत नियम

प्लास्टिक कचरा व्यवस्थापन (सुधारित) नियम, 2021 नुसार, पंचाहत्तर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या कॅरी बॅगचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना आता रस्त्यावर विक्रेते, स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या पातळ प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करणे टाळण्यास प्रोत्साहित केले जात आहे. भाजी विक्रेते, दुकानदार यांनी आता इतर पर्याय वापरावेत, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

प्लास्टिक आणि घनकचरा निर्मूलन हा सामाजिक विषय असल्याने त्यावर सरकारबरोबरच सर्वसामान्य जनतेनेही काम करणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून माणसांनीच प्लास्टिक वापरावर बंदी आणली, तर नक्कीच पर्यावरण संतुलित राहणार आहे. भारतामध्ये मुंबई महापालिका एकमेव प्लास्टिक बंदी कटाक्षाने पाळणारी महापालिका असून, दंडात्मक कारवाईबरोबरच इतर पर्याय शोधणे आवश्यक आहे.

– राजेंद्र माहुलकर, पर्यावरण, सिंचन आणि जलविद्युत तज्ज्ञ

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news