सोनई : नुकसानग्रस्त शेतकर्यांना आर्थिक मदत करा : आ शंकरराव गडाख
सोनई(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातील रविवारी (दि. 4) वादळाचा तढाखा बसला. अनेक गावांत घरांवरील पत्रे उडाले, पिकेही जमीनदोस्त झाले आहेत. तसेच विजेचे खांब कोलमडून पडले असून, कांदा चाळींचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत करण्याची मागणी आमदार शंकरराव गडाख यांनी केली.
यापूर्वी अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच अवकाळी अनुदानापासूनही तालुक्यातील 5 मंडले वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच रविवारी झालेल्या वादळाने नेवासा तालुक्यातील झापवाडी, नांदूरशिकारी, नेवासा फाटा, सोनई, दिघी व अनेक गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. केळी, डाळिंब या फळबागा भुईसपाट झाल्या आहेत.
वादळामुळे नुकसान झालेल्या घरांचे, तसेच शेती पिकांचे नेवाशाच्या तहसीलदारांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. गावा गावातील पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी तसेच वादळामुळे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यांचीही महावितरणने तातडीने दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आमदार गडाख यांनी केली आहे.
हेही वाचा
पाथर्डी तालुक्यात वादळी वार्यामुळे कोसळले टोलनाक्याचे शेड; 7 कर्मचारी बालबाल बचावले