रत्नागिरी, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बारसू रिफायनरी प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.१६) प्रकल्प विरोधकांच्या तीन गाड्या पोलिसांनी अडवून त्यांना पुर्णगड पोलीस ठाण्यात माघारी पाठवले. तीन गाड्यांमधील १४ विरोधक शेतकरी, ग्रामस्थांना पूर्णगड पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
शिवणे खुर्दमधील काशिनाथ गोर्ले, आनंद बेडेकर, अंकुश आरेकर, प्रशांत घाणेकर, कपिल वाईम, संजना बोळे, पल्लवी आरेकर, रंजना घाडी, प्रिया आरेकर तसेच गोवळमधील विजय घाडी, गणेश केळंबेकर, प्रतीक्षा कांबळे, राखी हातणकर, देवाचे गोठणे येथील राकेश करगुटकर अशी ताब्यात घेण्यात आलेल्या १४ जणांची नावे आहेत. पूर्णगड पोलीस ठाण्यात नेऊन त्यातील विरोधकांना मुख्यमंत्र्यांचा दौरा पूर्ण होईपर्यंत नजरकैदेत ठेवण्यात आले होते.
बारसू रिफायनरी प्रकल्प विरोधकांकडून पावस – भाटये मार्गे रत्नागिरीत येऊन कोणताही अनुचित प्रकार होण्यापासू रोखण्यासाठी हा बंदोबस्त करण्यात आला होता. या चेक पोस्टवर नाटे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासो पाटील यांच्या पथकासह शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले होते. त्यांच्याकडून पावस ते रत्नागिरी येणाऱ्या रस्त्यावर भाटये पुलाच्या अलीकडे ठीक-ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आली होती.