[toggle title="रमेश चौधरी" state="open"][/toggle]
शेवगाव(अहमदनगर) : नगर जिल्हात दुष्काळ जाहीर करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून यासाठी पालकमत्र्यांसह सर्व आमदार प्रयत्नाला लागले आहेत. जिल्ह्यातील विविध पक्ष, संघटना यांनीही आता जनआंदोलन उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. जिल्ह्याची एकंदरीत पीक परिस्थिती पाहता महिन्यापासून पडलेल्या पावसाच्या खंडाने खरीप पिके अखेरची घटका मोजत आहेत. काही गावांतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढत आहे, तर जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले; मात्र अपवाद वगळता धो-धो पावसाला शेतकरी मुकला आहे. पहिल्या पावसात पेरण्या केल्या खर्या; परंतु त्यानंतर बदलत्या निसर्गाने शेतकर्यांना पश्चाताप करण्यास भाग पाडले. शेतकरी अपेक्षेवर असतो. यावेळी सर्व अपेक्षांचा भंग झाला आणि शेतकर्यांचा निसर्गावरचा विश्वास उडाला आहे.
बाजरी, तूर, कपाशी, सोयाबीन अशा खरीप उत्पन्नाची आशा मावळली असून ही गंभीर परिस्थितीचे जवळपास संपूर्ण जिल्ह्याला चटके बसल्याने दि. 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री, आमदार, सर्व विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. या बैठकीत चारा नियोजन, पाणी टँकर, धरणातील पाण्याचे नियोजन यावर चर्चा झाली असली, तरी बैठकीत जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचे पडसाद उमटले. त्यामुळे पक्ष भेदभाव बाजूला ठेवून नगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती आहे.
या संदर्भात शासनाला परिस्थितीची संपूर्ण माहिती देण्यात येणार असून आता दुष्काळासाठी राजकारण बाजूला ठेवून सत्ताधार्यासह विरोधी पक्षांना एकत्रित लढा उभारून शासनास दुष्काळ जाहीर करण्यास भाग पाडावे लागणार आहे. आज शेतकरी मोठ्या संकटात अडकला आहे. केवळ याच संकटाने बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. हळूहळू इतरही संकटांची झळ निर्माण होणार आहे. हा जिल्हा जागरूक आहे. राज्याच्या राजकारणात जिल्ह्याचे वर्चस्व आहे. त्यामुळे संकटकाळात शेतकर्यांना धीर देण्याची जबाबदारी प्रत्येकाला निभवावी लागणार आहे.
पंतप्रधान विमा योजनेसाठी काही मंडळांत सलग तीन आठवडे पाऊस न झाल्याने तेथील सर्वेक्षण अहवाल सादर झाला आहे. मात्र काही मंडळांत सलग 20 दिवस पाऊस नाही, मात्र एकविसाव्या दिवशी, तोही अत्यंत किरकोळ पाऊस झाल्याने, त्या गावांना शासन निकषाप्रमाणे या अहवालातून वगळण्यात आले. सदर मंडळांनाही विमा योजना लागू करण्याची मागणी होत आहे
चोवीस तासांत 2.5 मिलिमीटर पाऊस झाला तर त्यालाच पाऊस म्हणून गणले जाते. याच्या आत पाऊस झाल्यास त्याची पावसात गणती होत नाही. काही मंडळांत 21 दिवसांच्या आत केवळ अर्धा ते एक मिलिमीटर पाऊस झाल्याने त्यांना प्रधानमंत्री विमा योजना लागू झाली नसल्याची माहिती आहे.
हेही वाचा