नाशिक : मुलीच्या सल्ल्यामुळे पित्याला मिळाले लाखोंचे उत्पन्न

मनमाड : येथे जिरेनियमची शेतीची पाहणी करताना कृषी अधिकारी व ग्रामस्थ.
मनमाड : येथे जिरेनियमची शेतीची पाहणी करताना कृषी अधिकारी व ग्रामस्थ.

नाशिक (मनमाड) : रईस शेख

कधी दुष्काळ, कधी अवकाळी आणि गारपीट निसर्गाच्या या लहरीपणासोबत शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून, कोणते पीक घ्यावे हे त्याला उमजत नाही. यामुळे सध्या शेती करणे काहीसे अवघड होत असून, पारंपरिक पिके बेभरवशाची झाल्यामुळे शेतकरी आता वेगवेगळे प्रयोग करू लागले आहेत. असाच एक प्रयोग मनमाडजवळच्या पांझणदेव येथील बाळासाहेब पाटील या शेतकऱ्याने त्यांच्या मुलीच्या सल्ल्याने केला. कांदे, मका, बाजरी या पिकांना फाटा देत त्यांनी जिरेनियमची लागवड केल्यामुळे त्यांना दर तीन महिन्यांनी लाखो रुपयांचे उपन्न मिळत आहे. त्यांच्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा असून, इतर शेतकरीही त्यांचा आदर्श घेत वेगवेगळे प्रयोग करण्याची तयारी करीत आहेत.

मनमाडसह नांदगाव तालुक्यातील शेती ही पावसावर जास्त अवलंबून असून, या भागात बहुतांश शेतकरी कांदा आणि मका लागवडीवर जास्त भर देतात. येथील पाटील यांना कोणत्या पिकाची लागवड करावी, असा प्रश्न पडलेला असताना त्यांची मुलगी माधुरी हिने त्यांना जिरेनियमची शेती करण्याचा सल्ला दिला. माधुरी ही बीटेक ॲग्रिकल्चर असल्यामुळे तिला जिरेनियमची माहिती होती. जिरेनियम ही एक सुगंधी वनस्पती असून, तिच्या पाल्यापासून तेल निर्मिती होते. जिरेनियमच्या तेलाला भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर प्रचंड मागणी आहे. सौंदर्य प्रसाधने तयार करणार्‍या कंपन्यांसह पानमसाला उद्योग, साबण, अत्तर, सुगंधी उद्योग, सुगंधित उपचार आणि औषधी निर्माण कंपन्यांकडून हे तेल खरेदी केले जाते. मुलीचा आग्रह आणि तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सहकार्य केल्याने पाटील यांनी सहा एकारांत लागवड केली असून, त्यातून त्यांना दर तीन महिन्यांनी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.

जिरेनियमवर करपा, मावा यासह इतर रोग येत नाहीत, त्यामुळे या पिकावर महागडी औषधांची फवारणी करावी लागत नाही. याला जनावरे खात नसल्यामुळे गवत वाढल्यास निंदणी ऐवजी शेतात जनावरे सोडली तर ते फक्त गवत खातात. अतिवृष्टी, गरपिटीचा या पिकावर परिणाम होत नाही. शिवाय एकदा लागवड केल्यानंतर सलग चार वर्षे या पिकातून उत्पन्न मिळते. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी जिरेनियम शेती असून, जिरेनियममधून केवळ सुंगधी तेल निघत नाही तर त्याच्या रॉ मटेरियलमधून कंपोस्ट खत, गुलाबपाणी तयार होते. – जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी, नांदगाव.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news