नागपूर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या हिट अँड रन कायद्यांतर्गत कडक नियमावली, 7 वर्षे शिक्षा 10 लाख रुपये दंडाच्या विरोधात आज (दि.१) नागपूर, अमरावती, रायपूर, जबलपूर महामार्ग रोखण्यात आला. यावेळी ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने दुपारपर्यंत वाहतूक खोळंबली. पारडीपासून पुढे सुरुची कारखान्यापर्यंत शासनाच्या विरोधात ट्रक चालकांनी चक्का जाम केला.
सकाळी ८.३० पासून ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यात उभे करण्यास सुरुवात केली. या आंदोलनादरम्यान एका ड्रायव्हरला पोलिसांनी मारहाण केल्याने वातावरण अधिकच तापले. गॅस गन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घडवून द्या, अशी मागणी पुढे केली. तोपर्यत एकही गाडी हटणार नाही, असा इशारा दिला.
दरम्यान, विविध संघटनांनी चक्काजाम आंदोलन केल्याने नागपूर – अमरावती राष्ट्रीय महामार्ग ६ वरील गोंडखैरी बायपास ३ तास बंद राहिला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
नवा हिट ॲंड रन कायदा हे या आंदोलनाचे मूळ कारण असून नव्या कायद्यात हिट ॲड रन मुळे एखाद्याचा मृत्यू झाल्यास दोषी चालकाला सात वर्षे पर्यंत तुंरुगवास किंवा दहा लाखांचा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा प्रस्तावित आहे. जर हिट अँड रन प्रकरणात एखाद्या वाहनाने धडक दिली आणि याची माहिती पोलिसांनी दिली नाही किंवा पळ काढला. तर दहा लाखांचा दंड किंवा सात वर्षे तुरुंगवासाची शिक्षा नव्या हिट ॲंड रन कायद्यात प्रस्तावित आहे. मात्र, अपघात झाल्यावर घटनास्थळी ट्रक ड्रायव्हर थांबले. तर जमावाकडून ट्रक चालकांना मारहाण होते. अनेकदा ट्रक चालकांना काही घटनांमध्ये जमावाने ठारही केले आहे. त्यामुळे नव्या 'भारत न्याय संहिते' मध्ये सुधारणा करताना ट्रकचालक आणि ट्रान्सपोर्टर्स यांना विचारात घ्यावे, अशी आंदोलकांची भूमिका आहे.
हेही वाचा