India @ 75 : ‘जन गण मन’ राष्ट्रगीताची ‘धून’ बनवणारे स्वातंत्र्यसैनिक!

India @ 75 : ‘जन गण मन’ राष्ट्रगीताची ‘धून’ बनवणारे स्वातंत्र्यसैनिक!
Published on
Updated on

जेव्हा आपण 'जन गण मन' या आपल्या राष्ट्रगीताची धून ऐकून सावधानमध्ये उभे राहतो तेव्हा आपल्याला ते लिहिणाऱ्या महान कवी रवींद्रनाथ टागोरांची आठवण होते; पण या गीताची धून कोणी रचली हे तुम्हाला माहीत आहे का?. जाणून घेवूया त्याविषयी…

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील खन्यारा गावात 15 ऑगस्ट 1914 रोजी जन्मलेले कॅप्टन रामसिंह ठाकुरी हे स्वातंत्र्यसैनिक तसेच उत्तम संगीतकार होते. ज्या काळात भारतभूमी ब्रिटीशांच्या अन्याय, अत्याचाराने त्रासलेली होती, त्या काळात कॅप्टन रामसिंग ठाकुरी यांनी कोट्यवधी  भारतीयांना संगीताच्या माध्यमातून एकत्र आणले. आताच्या काळात अनेकांना त्यांच्या नावाचा विसर पडला असेल; पण सांगितीक शौर्याद्वारे कॅप्टन रामसिंह यांचा आत्मा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्याबद्दल जाणून घेणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

रामसिंह यांना कॅप्टन रामसिंह ठाकुरी यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती आणि त्यांच्या आजोबांनी त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले. शिवाय, त्यांच्या वडिलांनी त्यांना सैन्य दलात भरती होण्यासाठी तयार केले. वयाच्या 14 व्या वर्षी ते गोरखा रायफल्समध्ये रुजू झाले.

मृत्यूपूर्वी 'द ट्रिब्यून'ला दिलेल्या मुलाखतीत रामसिंह यांनी सांगितले की, 'मला संगीताची प्रेरणा माझे आजोबा नथू चंद यांच्याकडून मिळाली. नंतर, मी लष्करातील प्रसिद्ध ब्रिटिश संगीतकार हडसन आणि डॅनिश यांच्याकडून ब्रास बँड, स्ट्रिंग बँड आणि नृत्य बँडचे प्रशिक्षणही घेतले. मी कॅप्टन रोज यांच्याकडून व्हायोलिन शिकलो.'

रामसिंह नेताजींना भेटले

ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धादरम्यान ऑगस्ट 1941 मध्ये भारतातून लष्कराच्या अनेक तुकड्या मलाय आणि सिंगापूरला पाठवल्या. त्यात रामसिंह यांचा समावेश होता. पण तेथील युद्धात ब्रिटीश सैन्याची जपानी सैन्यासमोर पिछेहाट झाली. त्यानंतर जपानी सैन्याने ब्रिटीश सैन्यातील अनेकांना कैद केले. यात सुमारे 200 भारतीय सैनिकांचा समावेश होता. त्यापैकी रामसिंह एक होते. यानंतर 1942 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी सैन्याच्या कैदेत असणा-या भारतीय सैनिकांची सुटका करून एकत्र केले आणि 'आझाद हिंद फौज' स्थापना केली. यावेळी रामसिंह पहिल्यांदा नेताजींना भेटले. या भेटीदरम्यान रामसिंह यांनी नेताजींबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी मुमताज हुसैन लिखीत गीत संगीतबद्ध करून त्याचे सादरीकरण केले. त्या गीताची संगीत रचना ऐकून उपस्थित सैनिकांनी रामसिंह यांचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले. त्या गीताची शब्द रचना पुढीलप्रमाणे आहे…

"सुभाष जी, सुभाष जी, वो जाने हिन्द आ गये
है नाज जिस पे हिन्द को वो जाने हिन्द आ गये"

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वत:चे व्हायोलिन रामसिंह यांना भेट दिले

नेताजी सुभाषचंद्र बोस रामसिंह यांच्या कलात्मक सांगितिक कौशल्याने इतके प्रभावित झाले की, त्यांनी स्वत:चे व्हायोलिन रामसिंह यांना भेट म्हणून दिले. तसेच नेताजींनी रामसिंह यांना अशा गाण्यांची निर्मीती करण्याची जबाबदारी दिली ज्याने आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना नेहमीच जाज्वल्य देश प्रेमाची उर्जा मिळेल. खुद्द नेताजींची कौतुकाची थाप पाठीवर पडताच रामसिंह यांनी "कदम-कदम बढ़ाये जा, ख़ुशी के गीत गाये जा, ये ज़िन्दगी है कौम की, तू कौम पे लुटाये जा।" या गीताला चाल देऊन ते संगीतबद्ध केले. या गीताची शब्द रचना पंडित वंशीधर शुक्ला यांनी केली होती. रामसिंह यांनी हे गीत संगीतबद्ध करून अजरामर केले. ब्रिटीशांविरोधात लढताना आझाद हिंद फौजेसाठी हे एक प्रेरणागीत होते. नंतर ते भारतातील एक अतिशय लोकप्रिय देशभक्तीपर गीत बनले.

1945 मध्ये ब्रिटीशांनी कॅप्टन रामसिंह यांनी संगीतबद्धा केलेल्या "कदम कदम बढ़ाये जा…" या गीतावर देशद्रोहाच्या आरोपाखाली बंदी आणली. तसेच कोलकाता येथील ब्रिटीश ग्रामोफोन कंपनीमध्ये रेकॉर्डिंगवर वाजवण्यासही मनाई केली. नंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या दोन आठवड्यांनंतर 29 ऑगस्ट 1947 रोजी ही बंदी उठवण्यात आली.

याशिवाय राणी ऑफ झांशी रेजिमेंट'चे 'हम भारत की लडकी हैं' हे मार्चिंग गीतही रामसिंह यांनीच संगीतबद्ध केले. पण या गीतांसह एक खास गीत आहे, ज्याची धून संगीतबद्ध करून ते देशाच्या इतिहासात अमर झाले. आजही हे गीत प्रत्येक भारतीयाच्या ओठांवर आहे. ते गीत म्हणजे आपले राष्ट्रगीत – 'जन-गण-मन अधिनायक जय हे'! हे गीत महान कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या लेखणीतून अवतरले असले तरी त्याची संगीत रचना प्रत्येक भारतीयापर्यंत पोहचवण्याचे काम केले ते कॅप्टन रामसिंह ठाकुरी यांनी.

आझाद हिंद फौज स्थापन होण्याच्या एक वर्ष अगोदरच नेताजींनी आपल्या पक्षाचे राष्ट्रगीत ठरवले होते, असे एका इंग्रजी मासिकाच्या अहवालात म्हटले आहे. त्यासाठी नेताजींनी टागोरांची 'भारतो भाग्यो-बिधाता' ही बंगाली कविता निवडली होती. ही तीच कविता आहे जिथून भारताचे आधुनिक राष्ट्रगीत 'जन-गण-मन' घेतले गेले.

नेताजींनी या कवितेचा हिंदी अनुवाद करण्याची जबाबदारी आझाद हिंद रेडिओचे लेखक मुमताज हुसेन आणि आयएनएचे कर्नल आबिद हसन सफारानी यांना दिली. दोघांनी ती जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली आणि 'शुभ-सुख चैन की बरखा बरसे' ऐतिहासिक गीत तयार झाले. यालाही कॅप्टन राम सिंह ठाकुरी यांनीच संगीतबद्ध केले. हे आझाद हिंद फौजेचे राष्ट्रगीत बनले, ज्याद्वारे देशातील प्रत्येक वर्गाला स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्यासाठी प्रेरित करणे हा त्या मागचा उद्देश होता.

हे गीत 1946 मध्ये राम सिंह यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी यांच्यासमोर सादर करण्यात आले. त्यावेळी ते व्हायोलिनवर वाजवून दाखवण्यात आले. यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, त्या प्रसंगी देखील कॅप्टन रामसिंह ठाकुरी यांच्या वाद्यवृंदाला राष्ट्रगीताची धून परफॉर्म करण्यासाठी आमंत्रीत करण्यात आले होते. हीच धून पुढे कायम करण्यात आली. 15 एप्रिल 2002 रोजी कॅप्टन राम सिंह ठाकुरी यांचे निधन झाले. मात्र त्यांनी रचलेली 'जन गण मन'ची ही धून आजही आपल्या देशासाठी अमूल्य वारसा आहे.

कॅप्टन राम सिंह ठाकुरी यांना मिळालेली पदके…

जॉर्ज सहावा पदक- 1937
नेताजी सुवर्ण पदक (आझाद हिंद) – 1943
पहिले राज्यपाल सुवर्ण पदक – 1956.
राष्ट्रपती पोलीस पदक 1972
युपी संगीत नाटक अकादमी (UP Music and Drama Academy) पुरस्कार – 1979
सिक्कीम सरकारचा मित्रसेन पुरस्कार – 1993
पश्चिम बंगाल सरकारचा पहिला आझाद हिंद फौज पुरस्कार – 1996

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news