औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत औरंगाबादची घसरण झाली आहे. गतवर्षी राष्ट्रीय स्तरावर औरंगाबादला २२ वे स्थान मिळाले होते. मात्र, यंदा ते तब्बल आठने घसरुन ३० पर्यंत खाली आले आहे. तर राज्याचा विचार करता औरंगाबाद ९ व्या स्थानावर आहे. गतवर्षी ते ६ व्या स्थानी होते.
भारत सरकारने २०१६ सालापासून स्वच्छ भारत मिशन सुरू केले आहे. यामध्ये देशभरातील शहरांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करुन स्वच्छतेतील त्यांचे स्थान निश्चित केले जाते. शिवाय पहिल्या दहा शहरांना पारितोषिक देऊन सन्मानित केले जाते. मागील काही वर्षात या सर्वेक्षणात औरंगाबाद शहराची कामगिरी सातत्याने सुधारत होती.
परंतु यंदा मात्र औरंगाबादचे स्थान अचानक घसरले आहे. केंद्र शासनाच्या पथकाने फेब्रुवारी महिन्यात शहरात येऊन सर्वेक्षण केले होते. त्यावेळी पथकाला शहरात काही भागात कचरा आणि अस्वच्छता आढळून आली होती. शनिवारी स्वच्छ भारत मिशनचा निकाल जाहीर झाला. त्यात दहा लाखांवरील लोकसंख्येच्या शहरांमध्ये औरंगाबाद देशपातळीवर ३० वे आणि राज्य पातळीवर ९ वे आले आहे. २०२० साली देशपातळीवर औरंगाबादचे स्थान २६ वे होते. ते २०२१ मध्ये सुधारुन २२ वे झाले. मात्र, यंदा त्यात पुन्हा घसरण होऊन आता औरंगाबादची नॅशनल रॅकिंग ३० इतकी आली आहे.
मी रुजू होण्याआधीच स्वच्छ सर्वेक्षण होऊन गेले होते. तरीही रॅंकिंग का घसरली याचा अभ्यास करुन ती सुधारण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. केवळ रॅकिंगच नव्हे तर स्वच्छतेच्या बाबतीत नागरिकांचे समाधान झाले पाहिजे यावरही आमचा भर राहील.
– डॉ. अभिजित चौधरी, महापालिका प्रशासक