Kapil Dev : ‘हा तर क्रिकेटच्या आयकॉनचा अपमान” : संजय राऊतांची पोस्ट चर्चेत  | पुढारी

Kapil Dev : 'हा तर क्रिकेटच्या आयकॉनचा अपमान" : संजय राऊतांची पोस्ट चर्चेत 

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, १९ नाेव्‍हेंबर राेजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्याला  दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव  यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. यावरुन क्रिकेट जगतातून नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पोस्ट करत  बीसीसीआय, आयसीसीसह केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्पष्टीकरण द्यावे लागेल, असं त्‍यांनी  आपल्‍या पोस्टमध्ये म्टटलं आहे. (Kapil Dev)

Kapil Dev : भारताचा अपमान झाला आहे…

 विश्‍वचषक स्‍पर्धेच्‍या अंतिम सामन्‍यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. या सामन्याला कपिल देव यांना आमंत्रित केले नव्हते यावरुन संजय राऊत यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत म्हटलं आहे की, “भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांना विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते. क्रिकेटच्या आयकॉनचा निर्लज्जपणे अपमान करण्‍यात आला आहे. भारताचा अपमान झाला आहे… किती मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे? बीसीसीआय, आयसीसीने जगाला समजावून सांगावे की त्यांनी भारतातील सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली असे केले का? त्यांना संपूर्ण क्रिकेट जगताचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

Kapil Dev : कपिल देव यांचा व्हिडिओ व्हायरल…

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणत आहेत की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करत आहेत.

भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी माजी क्रिकेटपटूंसह अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे मैदानावर टीम इंडियाचा जयजयकार करताना दिसले, पण माजी दिग्गज कपिल देव म्हणतात की त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.

मी याचा निषेध करतो : अनिल देशमुख

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनीही पोस्ट करत बीसीसीआयने देशवासीयांना स्पष्टीकरण द्यायला हवे की, कपिल देव यांना सामन्याला का आमंत्रित केले नाही याचे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “१९८३ च्या विश्वचषकाचे नायक कपिल देव यांना क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे निमंत्रण नसणे ही आश्चर्यकारक आणि क्लेष दायक बाब आहे. मी याचा निषेध करतो. नेमक कारण काय आहे याचे बीसीसीआयने देशवासीयांना स्पष्टीकरण द्यायला हवे!”

हेही वाचा 

Back to top button