डिंभेच्या पाण्यासाठी एकत्र या : वळसे-पाटील | पुढारी

डिंभेच्या पाण्यासाठी एकत्र या : वळसे-पाटील

मंचर : पुढारी वृत्तसेवा : भविष्यात हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)च्या पाण्याचा अवघड प्रश्न उभा राहणार आहे. डिंभे धरणाचे पाणी बोगदा पाडून माणिकडोह धरणात नेण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न यशस्वी झाला, तर डिंभे धरणातील पाणीसाठा तीन महिन्यांत संपून जाऊ शकतो. यामुळे नदीवरील बंधार्‍यांमध्ये पाणीसाठा कसा करायचा, हा प्रश्न निर्माण होणार आहे. या संदर्भात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. हा लढा एकट्याचा नसून सर्वांचा आहे. हे भविष्यातील मोठे अवघड संकट थांबवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.

संबंधित बातम्या : 

आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी येथे गणेश चतुर्थीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. या वेळी वळसे पाटील बोलत होते. या वेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सपत्नीक गणरायाचे दर्शन घेऊन आरतीचा मान स्वीकारला. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, युवा नेत्या पूर्वा वळसे पाटील, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले, सरपंच बाळासाहेब मेंगडे, उद्योजक योगेश मेंगडे, युवा सेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत मेंगडे, उपाध्यक्ष भास्कर मेंगडे, जिजाभाऊ मेंगडे, भरत फल्ले,संजय गोरे, पोपटराव मेंगडे, शरद मेंगडे, देवस्थानचे विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी वळसे पाटील म्हणाले, तालुक्यातील लोणी धामणी परिसरात तसेच सातगाव पठार परिसरात दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी संकटांना सामोरे गेले पाहिजे आहे. यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे. आढळराव पाटील यांना सोबत घेऊनच मेंगडेवाडी देवस्थानला मकफ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

16 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर
राज्यात पुरेसा पाऊस न पडल्याने 16 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत. यामुळे पाणी तसेच जनावरांना चारा हा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. या दुष्काळी परिस्थितीत सर्व संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यासाठी पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

शिरूर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रत्येक गावागावांत विकासाची कामे करण्यात आली. रात्रंदिवस मी जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मेंगडेवाडी गावाच्या विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही.
                                            -शिवाजीराव आढळराव पाटील, माजी खासदार.

Back to top button