

बीड; पुढारी वृत्तसेवा
बीड तालुक्यातील पाली येथील एका शेतकऱ्याने २४ नोव्हेंबर २०२० रोजी सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाटबंधारे कार्यालय बीड येथे पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केले. या प्रकरणाला आता १ वर्ष उलटून गेले तरी आरोपींना अटक करण्यात आलेले नाही. यामुळे शेतकऱ्याच्या विधवा पत्नीने थेट स्मशानभूमीत आमरण उपोषणास सुरूवात केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बीड तालुक्यातील पाली येथील शेतकरी अर्जुन कुंडलीक साळुंके यांनी २४ नोव्हेंबर २०२० मध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून पाटबंधारे कार्यालय बीड येथे पेट्रोल ओतून जाळून घेऊन आत्मदहन केले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग बीड, भूमी अभिलेख उपअधीक्षक, बीड उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) बीड या 3 अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल असून १ वर्ष उलटून गेले तरी पोलिसांनी अद्यापही आरोपींविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान दाखल झालेला गुन्हा परत घेण्यासाठी आरोपी वेगवेगळ्या माध्यमातून दबाव आणत असल्याचेही अर्जुनच्या पत्नी तारामती अर्जुन साळुंके हिने सांगितले आहे.
यानंतर या प्रकरणातील संबधीत आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या मागणीसाठी अर्जुनच्या पत्नीने अंत्यविधी ज्या स्मशानभूमीत केला त्या पाली गावातील बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातील स्मशानभूमीत बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
भूमीअभिलेख कार्यालयाकडून एकत्रिकरणात झालेल्या अनियमिततेमुळे अर्जुन कुंडलिक साळुंके यांचे संपादित क्षेत्र व उर्वरित क्षेत्र यांच्यात गुंतागुंत होऊन कमी झाल्याने त्यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता. मात्र या प्रकरणी संबंधित सरकारी अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने दप्तर दिरंगाईला कंटाळून अर्जुन कुंडलिक साळुंके यांनी दि. २४ नोव्हेंबर रोजी आत्मदहन केले होते.
घरातील कर्ता पुरुष असा अकाली गेल्याने पीडित परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला होता. दरम्यान आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांनी गुन्हा परत घेण्यासाठी पीडित कुटुंबातील व्यक्तींवर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
हेही वाचलत का?