

Virat Kohli Statement T20 World Cup 2026: भारताने सलग दुसरा टी २० वर्ल्डकप जिंकून अनेक विक्रमांना गवसणी घातली. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा तब्बल ९६ धावांनी पराभव करत अहमदाबाद स्टेडियमवर लागलेला पनौतीचा टॅग देखील पुसून काढला.
हा विजयी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी भारताचे दोन दिग्गज वर्ल्डकप विजेते कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा देखील अहमदाबाद स्टेडियमवर उपस्थित होते. त्यांच्या जोडीला लेजंडरी कपिल देव देखील होते. मात्र सर्वांचा लाडका रनमशीन विराट कोहली मात्र कुठंच दिसत नव्हता. भारताच्या बाद फेरीतील एकाही सामन्याला विराट कोहली उपस्थित नव्हता. त्यामुळं हा चर्चेचा मुद्दा झाला होता.
मात्र भारताच्या विजयानंतर विराट कोहलीने एक भन्नाट पोस्ट करत टीम इंडियाचो विजयासाठी अभिनंदन केलं. त्याने ही पोस्ट आपण अजूनही संघाचा भाग असल्यासारखीच केली हे विषेश....
विराट कोहली टीम इंडियाचे अभिनंदन करताना म्हणाला, 'पुन्हा एकदा चॅम्पियन (तीन स्टार). अहमदाबाद फायनलमध्ये आमचा जबरदस्त विजय. आमच्या मुलांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान दबावात देखील अत्यंत झुंजार वृत्ती दाखवली. विशेष म्हणजे खरोखर या खेळाडूंच्या गुणवत्तेच्या जवळपास देखील कोणी नाही. संपूर्ण संघ व्यवस्थापनाचे आणि सपोर्ट स्टाफचे देखील अभिनंदन. ते या प्रवासाचा एक साक्षीदार आहेत. तुम्ही या विश्वविजेतेपदासाठी खरोखर पात्र आहात. जय हिंद.'
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडसमोर २५५ धावांचा डोंगर उभारला होता. भारताकडून सलामीवीर संजू सॅमसनने स्पर्धेतील आपले सलग तिसरे अर्धशतक ठोकत ८९ धावांची दमदार खेळी केली. त्याला अभिषेक शर्माने ५२ तर इशान किशनने ५४ धावा करून चांगली साथ दिली. शिवम दुबेने देखील ८ चेंडूत २६ धावा ठोकत भारताला २५० चा टप्पा पार करून दिला.
त्यानंतर गोलंदाजीत अनुभवी जसप्रीत बुमराहनं भेदक मारा करत १५ धावात ४ बळी टीपले. अक्षर पटेलने ३ षटकात २६ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. वरूण अभिषेक शर्मा आणि हार्दिकने प्रत्येकी १ विकेट घेत या दोघांना चांगली साथ दिली. भारतानं न्यूझीलंडचा डाव १५९ धावात गुंडाळत सामना ९६ धावांनी खिशात टाकला. न्यूझीलंडकडून टीम सैफेटने ५३ तर मिचेल सँटनरने ४७ धावा करत एकाकी झुंज दिली.