

मुंबई : गौतम गंभीर यांचा भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यकाळ २०२७ च्या विश्वचषकापर्यंत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या आयसीसी स्पर्धेनंतरही गंभीर आपल्या जबाबदाऱ्या पुढे सुरू ठेवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या गंभीर यांच्यासमोर सध्या चालू असलेला टी-२० विश्वचषक आणि पुढील वर्षी होणारा बहुप्रतिक्षित एकदिवसीय विश्वचषक जिंकणे ही दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. त्यामुळे गंभीर यांचे भविष्य मोठ्या प्रमाणावर या दोन स्पर्धांच्या निकालांवर अवलंबून असेल.
एका वृत्तानुसार, गंभीर यांचा कार्यकाळ २०२७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापलीकडेही वाढू शकतो. जर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) त्यांच्यावरील विश्वास कायम राहिला, तरी अंतिम निर्णय हा गंभीर यांचाच असणार आहे.
२०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत गंभीर या पदावर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तब्बल १२८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होत आहे. ऑलिम्पिकमधील भारताची पदकांची संख्या कमी असताना, क्रिकेटमध्ये सुवर्णपदक मिळवणे हे पूर्णतः शक्य असून ते देशासाठी अत्यंत अभिमानास्पद ठरेल.
भारताने ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण १० सुवर्णपदके जिंकली आहेत, ज्यापैकी ८ पदके पुरुष हॉकी संघाने पटकावली आहेत. वैयक्तिक क्रीडा प्रकारात केवळ नेमबाज अभिनव बिंद्रा आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी सुवर्ण इतिहास रचला आहे. बिंद्राने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताचे पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते, तर नीरज चोप्राची कामगिरी तितकीच ऐतिहासिक ठरली, कारण ते ॲथलेटिक्समधील भारताचे पहिले सुवर्णपदक होते.
अनेक रौप्य आणि कांस्य पदके मिळवूनही भारताला सुवर्णपदकांचा दुष्काळ जाणवत आहे. अशा स्थितीत टी-२० स्वरूपात क्रिकेटचे ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन होणे, हे सात वर्षांनंतर भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करू शकते.
भारताचा सध्याचा टी-२० संघ जगातील सर्वोत्तम आणि आक्रमक संघ मानला जातो. संघाची राखीव फळी पाहता २०२८ पर्यंत हा संघ अधिक प्रबळ होईल, यात शंका नाही. आपल्या संघाला शिखरावर नेणे हे प्रत्येक प्रशिक्षकाचे स्वप्न असते आणि दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या गंभीर यांच्यासाठी भारताला ऑलिम्पिक सुवर्ण मिळवून देणे हे करिअरमधील सर्वोच्च यश ठरेल.
मात्र, हे सर्व बीसीसीआयच्या निर्णयावर अवलंबून आहे. गंभीर यांनी प्रशिक्षक म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक जिंकून दिला आहे. मात्र, त्यांच्या प्रशिक्षणाखाली कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाची घसरण दुर्लक्षित करता येणार नाही. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली कसोटी स्वरूपात भारतीय संघाची पकड ढिली झाली असून, मायदेशात दोनदा झालेला व्हाईटवॉश आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील घसरलेले स्थान ही चिंतेची बाब आहे.
२०२६ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी कसोटीच्या दृष्टीने थोडे शांत असेल, ज्यामध्ये केवळ पाच सामने नियोजित आहेत. मात्र, २०२७ च्या जानेवारीत मायदेशात होणाऱ्या 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी'पासून पुन्हा कसोटीचा खरा कस लागेल.
नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ०-२ अशा पराभवानंतर, आपण या पदासाठी योग्य आहोत की नाही याचा निर्णय बीसीसीआयने घ्यावा, असे गंभीर यांनी स्पष्ट केले होते. तरीही, सध्या बीसीसीआयसमोर इतर पर्याय मर्यादित आहेत. व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी या पदासाठी स्पष्ट नकार दिला आहे आणि बीसीसीआय विदेशी प्रशिक्षकांकडे वळण्यास फारसे उत्सुक नाही. जोपर्यंत एखादा सक्षम भारतीय पर्याय समोर येत नाही, तोपर्यंत गौतम गंभीर यांची भूमिका २०२८ च्या ऑलिम्पिकपर्यंत वाढू शकते.