

Vaibhav Sooryavanshi: आयपीएल २०२६ च्या हंगामात धडाकेबाज फलंदाजी करणार वैभव सूर्यवंशी आता भारतीय अ संघाकडून खेळतोय. भारतीय अ संघ सध्या श्रीलंकेत ट्राय सिरीज खेळत असून इथं आतापर्यंत तीन सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट जशी तळपायला पाहिजे होती तशी तळपलेली नाही. आजच्या सामन्यात देखील वैभव सूर्यवंशी १४ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. पुन्हा एकदा वैभव मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
दांबुलाच्या मैदानावर सुरू असलेल्या आजच्या श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात वैभवने तीन चौकार आणि एक षटकार मारत दमदार सुरूवात केली. त्याने १४ चेंडूत २१ धावा केल्या. मात्र त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार सहान अराचिग याने त्याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात खेचलं. वैभव सहानला मोठा फटका मारण्याच्या तयारीत होता. मात्र त्याला बॉल टाईम करता आला नाही. त्याने चेंडू थेट वानूजाच्या हातात मारला.
गेल्या काही सामन्यात वैभव सूर्यवंशीची कामगिरी त्याच्या लौकिकास साजेशी होत नाहीये. त्याने गेल्या तीन सामन्यात १४, ४४ आणि २१ धावा केल्या आहेत. आयपीएलमधील त्याची फलंदाजीची आकडेवारी आणि आताची आकडेवारी यात खूप फरक दिसत आहे.
आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. त्याने दिग्गजांचे चेंडू स्टेडियमच्या कोपऱ्या कोपऱ्यात पोहचलवले होते. भारताकडून खेळताना मात्र वैभवची कामगिरी खालावत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबाव हा वेगळा असतो. त्याचबरोबर श्रीलंका आणि अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी वैभव विरूद्ध चांगली रणनिती आखली होती. त्यांना वैभवचा उधळलेला वारू आवरण्यात यश आलं.
वैभव सूर्यवंशी पहिल्या चेंडूपासून चाचपडतोय असं दिसत नाहीये. तो आपल्या इनिंगची धडाक्यात सुरूवात करतोय. मात्र त्याला मोठी खेळी करण्यात अपयश येत आहे. आयपीएलमध्ये त्याला व्यवस्थापनाने मुक्तपणे खेळण्याची मुभा दिली होती. जर तो त्याच फिअरलेस मोडमध्ये फलंदाजी करू लागला तर त्याला मोठं यश मिळवता येईल.
मात्र टी २० क्रिकेट आणि वनडे क्रिकेटमध्ये काही फरक असतो. तसेच आयपीएलच्या पाटा खेळपट्ट्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजांना थोडी मदत मिळेल अशा खेळपट्ट्या असतात. त्यामुळं वैभवला म्हणावं तितकं यश मिळत नाहीये
वैभव सूर्यवंशीच्या गुणवत्तेवर कोणताही आक्षेप नसून सतत धावा करण्यात अपयश आल्यामुळं संघ व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये निराशा पसरते. त्यातच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळपट्ट्या आयपीएलच्या तुलनेत थोड्या कमी पाटा असतात. त्यातच श्रीलंकेत खेळपट्टी सहसा फिरकीला साथ देणारी आणि चेंडू जुना झाल्यावर वेगवान गोलंदाजांना मदत करणार असते.
त्यामुळं चेंडू नवा असेपर्यंत वैभव तो चांगल्या प्रकारे क्लिअर करू शकतो. मात्र एखादा मिसटाईम झालेला चेंडू थेट फिल्डरच्या हातात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं वैभवनं आक्रमक खेळासोबतच फिल्ड प्लेसमेंट पाहून फटकेबाजी करणं देखील गरजेचं आहे.