

India Pakistan match controversy
लाहोर : २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून निर्माण झालेला पेच आता आणखी गडद झाला आहे. पाकिस्तानने १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने स्पर्धेला नाट्यमय वळण मिळाले असतानाच, आता बांगलादेशने या वादात उडी घेतल्याने प्रकरणाला नवी धार आली आहे.
या वादाची ठिणगी बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (BCB) भूमिकेमुळे पडली. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने सुरक्षा कारणांचा हवाला देत आपल्या संघाला भारतामध्ये खेळण्यास पाठवण्यास नकार दिला होता. बांगलादेशने आपले सामने सह-यजमान श्रीलंकेत हलवण्याची विनंती 'आयसीसी'ला (ICC) केली होती. मात्र, स्वतंत्र सुरक्षा यंत्रणांच्या अहवालात कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली. सहभागाची अंतिम मुदत उलटून गेल्याने आयसीसीने बांगलादेशला स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या जागी 'ग्रुप सी'मध्ये स्कॉटलंडचा समावेश केला.
बांगलादेशच्या हकालपट्टीनंतर पाकिस्तान सरकारने आणि पीसीबीने बांगलादेशची पाठराखण केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी राष्ट्रीय संघाला १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथे होणाऱ्या भारताविरुद्धच्या 'हाय-व्होल्टेज' सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे निर्देश दिले आहेत. पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी बांगलादेशवरील कारवाईला 'अन्यायकारक' आणि 'राजकीय प्रेरित' म्हटले आहे. कोणत्याही बोर्डाला असुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी खेळण्यासाठी भाग पाडले जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
सध्याचा कोंडी फोडण्यासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमीनुल इस्लाम बुलबुल लाहोरमध्ये दाखल झाले असून त्यांची मोहसिन नकवी यांच्याशी चर्चा सुरू आहे. या बैठकीनंतर दोन्ही देशांचे प्रतिनिधी आयसीसीच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. हे दोन्ही बोर्ड आयसीसीसमोर एकजूट दाखवण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद(आयसीसी) ने पाकिस्तानला या बहिष्कारामुळे होणाऱ्या परिणामांची जाणीव करून दिली आहे. जर पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर मोठी आर्थिक दंडात्मक कारवाई, गुण गमावणे, सदस्यत्व रद्द करणे किंवा भविष्यातील जागतिक स्पर्धांच्या यजमानपदावर गदा येणे, अशा स्वरूपाचे निर्बंध लादले जाऊ शकतात.दरम्यान, 'फोर्स मॅजेअर' (Force Majeure) कलमाचा वापर करून पाकिस्तान या सामन्यातून माघार घेण्याचा प्रयत्न करत आहे, ज्यावर आयसीसीने स्पष्टीकरण मागितले आहे.
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सँग गुप्ता यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शाम्मी सिल्वा यांची भेट घेतली आहे. जरी परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी एका आयसीसी संचालकाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान बोर्डाने आता चर्चेसाठी तयारी दर्शवली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान हा हाय-प्रोफाईल सामना नियोजित वेळेत पार पडेल, अशी आशा क्रिकेट विश्वाला आहे.