

T20 World Cup 2026
कराची : येथे पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मार्शला काही अनपेक्षित प्रश्नांचा सामना करावा लागला. टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत पाकिस्तानचा भारताविरुद्धचा सामना आणि बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेतून घेतलेली माघार यावर मार्शने अत्यंत चपळाईने उत्तर देत वादावर पडदा टाकला.
पाकिस्तान सरकारने आपल्या क्रिकेट संघाला कोलंबोमध्ये भारताविरुद्ध खेळण्याची परवानगी नाकारल्याबद्दल विचारले असता मार्श म्हणाला, "या विषयावर सध्या मला कोणतेही भाष्य करायचे नाही. आम्ही विश्वचषकासाठी जात आहोत, आमचे पूर्ण लक्ष आमच्या कामगिरीवर असेल. मैदानाबाहेरील गोष्टी कशा हाताळायच्या, हे संबंधित लोक पाहतील." या विषयावर मत मांडण्यासाठी आपण योग्य व्यक्ती नसल्याचेही त्याने यावेळी स्पष्ट केले.
भारतात खेळण्यास बांगलादेशने नकार दिल्यानंतर त्यांच्या जागी स्कॉटलंडचा संघ स्पर्धेत सामील झाला आहे. या वादावर विचारले असता मार्शने पुनरुच्चार केला की, ऑस्ट्रेलियाचा एकमेव उद्देश विश्वचषक जिंकणे हाच आहे. तो पुढे म्हणाला, "भारत आणि श्रीलंकेतील सुरक्षेबाबत आम्हाला आयसीसी आणि स्थानिक प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था केली जाईल याची आम्हाला खात्री आहे."
दरम्यान, टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचे सर्व साखळी सामने श्रीलंकेत होणार आहेत.
११ फेब्रुवारी: आयर्लंडविरुद्ध (आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो)
१३ फेब्रुवारी: झिम्बाब्वेविरुद्ध (आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो)
१६ फेब्रुवारी: श्रीलंकेविरुद्ध (पल्लेकेले स्टेडियम)
२० फेब्रुवारी: ओमानविरुद्ध (पल्लेकेले स्टेडियम)