

नवी दिल्ली : लखनौ सुपर जायंटस् संघाने ऋषभ पंतला 27 कोटींना विकत घेऊन कर्णधार केले. तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू म्हणून स्पर्धेत सहभागी झाला. त्यामुळे त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या; पण तो त्या पूर्ण करू शकला नाही. पंत संपूर्ण हंगामात खराब फॉर्मशी झुंजत आहे. पंजाब किंग्जविरुद्ध 17 चेंडूंत 18 धावा केल्यानंतर तो बाद झाला. तर या हंगामात तो 11 सामन्यांमध्ये 12.8 च्या सरासरीने आणि 99 च्या स्ट्राईक रेटने फक्त 128 धावा करू शकला.
पंतची कामगिरी पाहून टीम इंडियाचा दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने पंतला त्याच्या लयीत परतण्यासाठी धोनीची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.
ज्या खेळींमध्ये ऋषभ पंतने भरपूर धावा केल्या आहेत, त्या खेळींचे व्हिडीओ पुन्हा बघण्याचा सल्ला वीरेंद्र सेहवागने पंतला दिला आहे. ‘क्रिकबझ’वर लखनौ सुपर जायंटस् आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्याचे विश्लेषण करताना त्याने हा सल्ला दिला.
दुखापतीनंतर ऋषभ पंतचा फॉर्म गेला आहे. त्याला पूर्वीसारखी फलंदाजी करता येत नाहीये, असेही तो म्हणाला. जर पंत धोनीला आपला आदर्श मानत असेल, तर त्याने त्याच्याशी फोनवर बोलले पाहिजे, असेही सेहवाग म्हणाला.
‘ऋषभ पंतला जर वाटत असेल की, तो स्वत: नीट विचार करू शकत नाही, तर त्याला मदत करणारे अनेक क्रिकेटपटू आहेत. त्याच्याकडे फोन आहे. त्याने फोन हातात घ्यावा आणि वाटेल त्या कोणालाही फोन करावा. जर तो धोनीला त्याचा आदर्श मानत असेल, तर त्याने धोनीशी बोलले पाहिजे,’ असाही सल्ला सेहवागने दिला आहे.
माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूने पंतच्या खराब फॉर्मबद्दल दुःख व्यक्त केले; पण त्याने पंतला हार न मानणारा खेळाडू म्हटले. तो म्हणाला की, पंतच्या धावा होत नसल्या, तरीही तो आपल्या जुन्या पद्धतीनेच खेळतोय. फॉर्म जाणे हा टप्पा सर्व खेळाडूंच्या बाबतीत घडतो. परंतु, आशा आहे की, तो अशा परिस्थितीत हार मानणार नाही. पंतकडे मधल्या फळीत खेळण्याचे कौशल्य आहे; पण ते योग्यरीत्या अंमलात आणण्याची मानसिकता त्याच्याकडे सध्या नाही. तो लवकरच चांगल्या फॉर्ममध्ये परतेल, असा विश्वास अंबाती रायडूने व्यक्त केला.