

Yuvraj Singh Slipper Comment: IPL 2026 च्या प्लेऑफच्या टीम ठरल्या असल्या, तरी याच दरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर युवराज सिंगने IPL मधील तीन खेळाडूंवर मजेशीर शैलीत नाराजी व्यक्त करत “तुम्हा सगळ्यांना चप्पल मारायची वेळ आली आहे” अशी टिप्पणी केली.
युवराज सिंगने ज्या तीन खेळाडूंवर ही प्रतिक्रिया दिली, त्यामध्ये प्रियांश आर्य, अर्शदीप सिंग आणि हरप्रीत ब्रार यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही खेळाडू IPL 2026 मध्ये पंजाब किंग्स संघाकडून खेळले होते आणि त्यांचा संघ यंदाही प्लेऑफमध्ये पोहोचू शकला नाही.
हरप्रीत ब्रारने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये प्रियांश आर्या आणि अर्शदीप सिंग देखील दिसत होते. हरप्रीतने मजेशीर अंदाजात प्रियांशला “स्लॉगर” तर अर्शदीपला “ब्लॉगर” असे संबोधले.
यावर युवराज सिंगने कमेंट करत लिहिले, “तुम्हा सगळ्यांना चप्पल मारायची वेळ आली आहे.” युवराजची ही कमेंट विनोदी स्वरूपात असल्याचे चाहत्यांकडून मानले जात असून सोशल मीडियावर ती चांगलीच व्हायरल झाली आहे.
IPL 2026 मध्ये पंजाब किंग्सला पुन्हा एकदा प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले. लीगमध्ये अनेकदा संघात बदल करूनही पंजाबला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
यंदाच्या हंगामात प्रियांश आर्याची कामगिरी तुलनेने चांगली राहिली. त्याने 13 सामन्यांत 211 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने 364 धावा केल्या. दुसरीकडे, अर्शदीप सिंहने 14 सामन्यांत 14 विकेट घेतल्या. मात्र त्याची इकॉनॉमी आणि सरासरी अपेक्षेइतकी चांगली नव्हती.
हरप्रीत ब्रारला फारशी संधी मिळाली नाही. त्याने फक्त 2 सामने खेळत 2 विकेट घेतल्या. दरम्यान, युवराज सिंगची ही मजेशीर कमेंट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून, ती पंजाब किंग्सच्या निराशाजनक कामगिरीवर केलेली कमेंट होती असं मानलं जात आहे.