

IPL 2026 playoffs qualification: इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा हंगाम आता एका निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. आता प्रत्येक सामना कोणाचा तरी गेम करणार आणि कोणाच्या तरी आशा पल्लवीत करणारा ठरणार आहे. जे संघ ग्रुप स्टेजमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी करत होते. त्यांचा फायनल लाईन क्रॉस करेपर्यंत गेम होण्याची शक्यता आहे. तर ज्या संघांची सुरूवात अत्यंत अडखळती झाली आहे ते संघ प्ले ऑफची रेस जिंकण्याची देखील दाट शक्यता निर्माण झाली आहे.
यंदाच्या हंगामात पंजाब किंग्ज आणि सरनाईजर्स हैदराबाद सारखे संघ कामगिरीत सातत्य राखत होते. हे संघ आरामात प्ले ऑफ गाठतील असं वाटत होतं मात्र ग्रुप स्टेजमधील शेवटाकडे येता येता त्यांची गाडी ढेपाळली असून जरी आपण म्हणत असलो की त्यांचा एक पाय आधीच प्ले ऑफमध्ये पोहचला आहे मात्र आता त्यांच्यावर प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडण्याची टांगती तलवार डोक्यावर लटकत आहे.
पंजाब किंग्जने यंदाच्या हंगामात सलग सात सामने जिंकून धडाकेबाज सुरूवात केली होती. श्रेयस अय्यर अर्थात पंजाबचा सरपंचच्या नेतृत्वात संघ आरामात प्ले ऑफ गाठेल असं वाटच होतं. मात्र आता त्यांनी सलग चार सामने गमावले असल्यामुळं त्यांचे प्ले ऑफचं गणित फसलं आहे. सध्याच्या घडीला त्यांचे १३ गुण झाले आहेत. त्यांना सुपर ४ मध्ये जाण्यासाठी १६ गुणांची गरज आहे. त्यांचे तीन सामने अजून शिल्लक आहेत. त्यांना पावसामुळं एका गुणाचा फायदा असला तरी आता गुणतालिकेत अशी स्थिती आहे की नजर हटी दुर्घटना घटी....
पंजाबचे पुढचे तीन सामने हे मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यासोबत होणार आहेत. यातील आरसीबी आणि मुंबई यांच्याविरूद्धचे सामने धरमशाला इथं होणार आहेत. तर लखनौ विरूद्धचा सामना हा लखनौमध्ये होणार आहेत.
मुंबई आणि लखनौ या दोन्ही संघांचा जरी फॉर्म खराब असला आणि ते आधीच प्ले ऑफच्या गणितातून बाहेर पडले असले तरी ते आता हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी मुक्तपणे खेळतील. आता सामन्यात सर्व दबाव हा पंजाब किंग्जवरच असणार आहे. त्यामुळं हे दोन सामने जरी सोपे दिसत असले तरी इथंच पंजाबच्या सरपंचाचं गणित बिघडू शकतं.
जर मुंबई आणि लखनौने पंजाबचा गेम केला तर आणि ते जरी आरसीबीविरूद्ध जिंकले तरी त्यांचे १५ गुण होतील. प्ले ऑफ गाठण्यासाठी किमान १६ गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यामुळं हंगामाची धडकाबेज सुरूवात करणारा पंजाब ग्रुप स्टेजमध्येच गाशा गुंडळून जाऊ शकतो.