

IND vs Netherlands T20 World Cup 2026 four Major Changes in Team India
अहमदाबाद : टी-२० विश्वचषक २०२६ च्या 'सुपर-८' फेरीचे तिकीट आधीच खिशात घातलेला भारतीय संघ बुधवारी, १८ फेब्रुवारी रोजी साखळी फेरीतील आपला शेवटचा सामना नेपालविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादव भारतीय संघात मोठे प्रयोग करण्याची शक्यता असून, प्रमुख खेळाडूंना विश्रांती देऊन राखीव फळीची चाचणी घेतली जाऊ शकते.
भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. अमेरिका, नामिबिया आणि त्यानंतर पाकिस्तानचा ६१ धावांनी धुव्वा उडवत भारताने दिमाखात पुढची फेरी गाठली आहे. आता खरी लढत 'सुपर-८' मध्ये वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे या संघांशी होणार आहे. या आव्हानांपूर्वी संघाचे संतुलन तपासण्यासाठी नेदरलँड्सविरुद्धचा सामना ही उत्तम संधी मानली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, स्टार सलामीवीर इशान किशन, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यांना या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. इशान पहिल्या सामन्यापासून खेळत आहे. बुमराहला काही दिवसांपूर्वी ताप आला होता, तर हार्दिकने सलग तीन सामने खेळले आहेत. मोठ्या सामन्यांपूर्वी या दोन्ही मॅचविनर खेळाडूंना सुरक्षित ठेवण्याचा व्यवस्थापनाचा विचार आहे.
पंड्याच्या अनुपस्थितीमुळे रिंकू सिंग आणि अक्षर पटेल यांना अतिरिक्त फलंदाजीचा वेळ मिळण्याची शक्यता आहे. दुखापतीमुळे बराच काळ बाहेर असलेल्या वॉशिंग्टन सुंदरलाही संधी दिली जाऊ शकते. आतापर्यंत प्रत्येक सामना खेळलेल्या वरुण चक्रवर्तीला त्याच्या जागी विश्रांती दिली जाईल असा अंदाज आहे.
बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजला प्लेइंग-११ मध्ये संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अहमदाबादची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते, त्यामुळे अशा परिस्थितीत सिराजच्या कौशल्याची कसोटी लागेल.
हार्दिकच्या अनुपस्थितीत शिवम दुबेला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. २०२५ च्या आशिया चषक फायनलप्रमाणे त्याला पूर्ण ४ षटके देऊन त्याच्या अष्टपैलू क्षमतेची चाचणी घेतली जाईल.
सलामीच्या जोडीतही बदलाचे संकेत असून इशान किशनच्या जागी संजू सॅमसनला संधी देऊन त्याच्या फॉर्मची चाचणी घेतली जाऊ शकते.
नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला येण्याची शक्यता आहे. यानंतर तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, रिंकू सिंह आणि अक्षर पटेल अशी तगडी फलंदाजीची फळी असेल. फिरकीची धुरा वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांच्याकडे, तर वेगवान गोलंदाजीची धुरा सिराज आणि अर्शदीप सिंह यांच्या खांद्यावर असेल.
अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या/वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद सिराज.