

पुढारी ऑनलाईन डेस्क
दक्षिण आफ्रिका दौर्यातील पहिला कसोटी सामना जिंकत टीम इंडियाने आपला दबदबा कायम ठेवला आहे. आता सोमवारपासून ( दि. 3 ) जोहान्सबर्गमध्ये दुसर्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. हाही सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. आता भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी ( mohammand shami ) याने सेंच्युरियन कसोटी सामन्यात २०० बळी पूर्ण केले. ही कामगिरी करताना त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
मागील काही वर्ष मोहम्मद शमीने ( mohammand shami ) आपल्या कामगिरीमध्ये सातत्य ठेवले आहे. यामुळे विश्लेषकांनी त्याचे वारंवार कौतुकही केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात शमीने २०० बळी पूर्ण केले. या पराक्रम त्याने केवळ ५५ कसोटी सामन्यांमध्येच केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर २०० बळी पूर्ण करणारा तो भारतातील ११वा गोलंदाज ठरला आहे. तसेच सर्वात कमी कसोटींमध्ये एवढे बळी घेण्याच्या यादीत तो आठव्या स्थानावर आहे.
२०० बळींचा टप्पा सर्वात कमी कसाेटी सामन्यांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम फिरकी गोलंदाज आर. अश्विन याच्या नावावर आहे. त्याने केवळ ३२ कसोटी सामन्यात २०० बळी घेतले होते. मात्र शमीने सर्वात कमी चेंडूंवर आपले २०० बळी पूर्ण करत अनोखा विक्रम केला आहे. त्याने केवळ ९८९६ चेंडू टाकत २०० बळी घेतले. अशी कामगिरी जसप्रीत बुमराह, अश्विन आणि ईशांत शर्मा यांनाही आजपर्यंत साध्य करता आलेली नाही.
अश्विनने २०० बळी घेण्यासाठी १०२४८ चेंडू टाकले. दहा हजारांपेक्षा कमी चेंडू टाकत शमीने २०० बळी घेत एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ११ गोलंदाजांमध्ये शमी अग्रस्थानी असून अश्विन दुसर्या स्थानावर आहे. जहीर खान आणि ईशांत शर्मा हे अनुक्रमे तिसर्या व चौथ्या क्रमांकावर आहेत.
हेही वाचलं का?