India-Australia ODI Series : भारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिका आजपासून; वर्ल्डकपची रंगीत तालीम

India-Australia ODI Series
India-Australia ODI Series

मोहाली : वृत्तसंस्था, India-Australia ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय मालिकेला आजपासून प्रारंभ होत आहे. अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाची रंगीत तालीम म्हणून या मालिकेकडे पाहिले जात आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहेच; पण भारताच्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या दोघांसाठी अतिमहत्त्वाची असेल. कारण या मालिकेतून श्रेयसला आपला फिटनेस तर सूर्याला आपला फॉर्म सिद्ध करावा लागेल.

संबंधित बातम्या :

भारतीय फलंदाजीचा कणा असलेले कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हे सामन्यात खेळणार नाहीत, अशा परिस्थितीत कोच राहुल द्रवीड यांच्याकडे राखीव फळी आजमावून पाहण्याची आणखी एक संधी असेल. मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये वरिष्ठ खेळाडू सहभागी होणार नाहीत. या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरचा मधल्या फळीत समावेश होऊ शकतो. (Ind vs Aus) श्रेयसला आशिया चषकात दुखापतीमुळे सामने खेळता आले नाहीत. अशा परिस्थितीत श्रेयसला विश्वचषकापूर्वी खेळण्याची संधी देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जगातील नंबर वन गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देताना प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद शमी यांना आजमावले जाऊ शकते. उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, विराट कोहली, रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याला पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली असून, के.एल. राहुलकडे संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या आयसीसी वन डे वर्ल्डकप 2023 पूर्वी भारतीय संघाने आपल्या सरावात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आशिया कपमध्ये आशिया खंडातील तगड्या संघांसोबत दोन हात केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाबरोबरच होणार आहे. तब्बल 5 वेळा वर्ल्डकप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाचे आव्हान हे कायमच तगडे असते. त्यामुळे या तीन वन डे मालिकेत दोन्ही संघ आपली ताकद आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन आजमावून पाहतील. Ind vs Aus

India-Australia ODI Series : हेड-टू-हेड

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 146 वेळा सामना झाला आहे, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 82 सामने जिंकले आहेत आणि भारताने 54 सामने जिंकले आहेत, तर 10 सामन्यांमध्ये कोणताही निकाल लागला नाही. भारतामध्ये या दोन संघांत झालेल्या 67 एकदिवसीय सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने 32 सामने जिंकले आहेत आणि भारताने 30 सामने जिंकले आहेत, तर 5 सामन्यांचा कोणताही निकाल लागू शकला नाही.

भारतातील 12 वी वन डे मालिका

ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत भारतात 11 एकदिवसीय मालिका खेळल्या आहे. या दोन संघांमधील पहिली द्विपक्षीय एकदिवसीय मालिका 1984 मध्ये खेळली गेली आणि शेवटची एकदिवसीय मालिका 2023 च्या सुरुवातीला खेळली गेली. 2020 पासून भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिका जिंकलेली नाही. विशेष बाब म्हणजे या दोन संघांमधील मागील चार एकदिवसीय मालिकांपैकी भारताने तीन मालिका गमावल्या आहेत.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news