

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय क्रिकेट संघाची नवीन निवड समिती जाहीर करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय ) आज ( दि. ७ ) ५ सदस्यीय पुरुष वरिष्ठ निवड समितीची नावे जाहीर केली. चार सदस्य पूर्णपणे नवीन आहेत; परंतु, निवड समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा चेतन शर्मा यांचीवर्णी लागली आहे, 'बीसीसीआय'ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे नवीन निवड समिती सदस्यांच्या नावांची घोषणा केली.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील मागील निवड समितीच्या कार्यकाळात भारताला टी -२० विश्वचषक स्पर्धेत दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्यानंतर 'बीसीसीआय'ने नवीन निवड समिती स्थापन करण्याची घोषणा केली. आता पुन्हा एकदा निवड समितीची धुरा चेतन शर्मा यांच्या हाती सोपविवण्याचा निर्णय 'बीसीसीआय'ने घेतला आहे. (BCCI Selectors)
क्रिकेट सल्लागार समितीने निवड समिती सदस्यांसाठी ६०० हून अधिक अर्जांपैकी ११ जणांची निवड केली होती नंतर त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. अखेर ११ पैकी ५ जणांची नावांची घोषणा आज करण्यात आली. चेतन शर्मा यांची अध्यक्षपदी तर माजी कसोटीपटू सलील अंकोला, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरद यांची सदस्यपदी निवड झाली आहे. (BCCI News)
मागील निवड समितीचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच 'बीसीसीआय'ने नवीन निवड समिती नेमण्याची घोषणा केली होती. अशा परिस्थितीत यावेळी पूर्णपणे नवे चेहरे पाहायला मिळतील, असे मानले जात होते. तथापि, निवड प्रकियेसाठी यामध्ये बराच वेळ घेतला आणि या काळात केवळ जुनी समिती टीम इंडियाची निवड करत होती. १ जानेवारी 2023 रोजी 'बीसीसीआय'ने टीम इंडियाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी आणि २०२३ च्या विश्वचषकासाठी रोडमॅप तयार करण्यासाठी बैठक घेतली होती.
हेही वाचा;