आई-मायेचं कवच लवकरचं छोट्या पडद्यावर | पुढारी

आई-मायेचं कवच लवकरचं छोट्या पडद्यावर

पुढारी ऑनलाईन डेस्क

प्रेम हे जगातलं सगळ्यात मोठं सुख… या प्रेमाची अनेक रूपं आहेत. अनेक रूपात ते आपल्याला गवसणी घालत असतं. प्रेम म्हणजे एक निर्मळ भावना, म्हटल तर निव्वळ एक शब्द, गवसलं तर स्वर्ग, पाहिलं तर नातं. मग ते नवरा बायकोच असो, बहीण – भावाचं असो, मैत्रीचं असो. पण, असं म्हणतात या संपूर्ण जगामध्ये आईचं प्रेम हे सर्वोच्च असते कारण ते निस्वार्थी असते. या प्रेमाची बरोबरी करण अशक्यचं ! पुत्र-कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता असूच शकतं नाही. आई – मुलाचं सुंदर नातं. या धाग्याला घेऊन कलर्स मराठी घेऊन येतं आहे मराठी टेलिव्हीजनवर पहिल्यांदा आई-मायेचं कवच ही नावीकोरी मालिका. आई-मायेचं कवच छोट्या पडद्यावर लवकरचं भेटीला येईल.

आई आपल्या मुलांना मायेच्या उबदार पंखात, आपल्या प्रेमाच्या कोषात सुरक्षित ठेवू पाहते. या दुष्ट जगापासून त्यांचे रक्षण करू पाहते. त्यातून जर ती एकटी पालकत्व पेलणारी आई असेल तर तिची जबाबदारी अजूनच वाढते. ती अधिक प्रोटेक्टिव होते. कारण, तिला दोन्ही जबाबदार्‍या निभावायच्या असतात. पण हीच माया, प्रेम शिस्त आजच्या मुलांना आवडत नसते. त्यांना तो बंधनांनाचा पिंजरा तोडून उंच भरारी घ्यायची असते. दोन्ही पिढीतील विचारतील फरक, आयुष्य जगण्याची पध्दत वेगळी असल्याने कुठेतरी वैचारिक तफावत त्यामध्ये दिसून येते.

मुलाचं पाऊल एकदा का चुकीचं पडलं तर समाज आईला डागण्या द्यायला तयार असतोच. म्हणूनच, ती मातृत्वासोबत सार्थ सांभाळत असते कर्तव्याचे कुंपण. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात पालकांना हा प्रश्न नेहेमी पडतो की आपल्या मुलांना आपण किती ओळखतो? याच प्रश्ननाचं उत्तर शोधताना उलगडलं जाणार आई – मुलाचं सुंदर नातं. या धाग्याला घेऊन कलर्स मराठी घेऊन येतं आहे मराठी टेलिव्हीजनवर पहिल्यांदा ही नवी कोरी मालिका.

एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास म्हणजेच ही मालिका. या कथेला झालर आहे एका गूढ रहस्याची… असं काय घडतं आई मुलीच्या आयुष्यात ज्यामुळे त्या दोघींचे संपूर्ण आयुष्यं बदलून जाते हे बघण रंजक असणार आहे. तेव्हा नक्की बघा ही मालिका २७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १० वाजता.

विराज राजे म्हणाले-मालिकांविषयी सांगायचे झाले तर, ते कसं असतं बरेचदा दूरंच जवळ दिसतं आणि जवळचं दूर. तसं अंतर दोन पिढीतल्या विचारात पडतं. आजच्या युगातील तरुण मुलांना आईच्या खूप प्रेमाचा वा काळजीचा त्रास होतो, जाच वाटू लागतो. कारणं विचार आणि आसपास असलेलं वातावरण. आजवर आई आणि मुलाचं नातं दर्शविणार्‍या अनेक मालिका येऊन गेल्या पण “आई” या मालिकेतून आम्ही पहिल्यांदा “सिंगल पेरेंट”आणि तिचा प्रवास या अतिशय नाजुक विषयाला हातळण्याचा प्रयत्न करणार आहोत. भार्गवी चिरमुले अतिशय गुणी कलाकार आहे आणि आम्हांला आनंद आहे तिने ही भूमिका करण्यास होकार दिला.

मालिकेतील आपल्या भूमिकेविषयी बोलताना भार्गवी चिरमुले म्हणाली, “आई या मालिकेतून मी कलर्स मराठी परिवाराशी पहिल्यांदा जोडले जात आहे. पुन्हा एकदा तुम्हां सगळ्यांच्या भेटीस येते आहे. एका नव्या भूमिकेत आणि नव्या मालिकेद्वारे. “आई” नावातचं सगळं समावलेलं आहे असं मला वाटतं मग ती सिंगल मदर असो गृहीणी असो वर्किंग वुमन असो. मुलाच्या तोंडून पहिला निघणारा शब्दचं आई असतो, कधी कुठे ठेच लागली, कुठे आपण अडकलो तर आपल्याला देवाच्याही पहिले आठवते ती आईच.

आपण हे लहानपणापासून ऐकले आहे देव साक्षात येऊ शकलो नाही म्हणून त्याने आईला आपल्यासाठी पाठवलं. आपल्या जगात इतकं मोठं महत्व आहे तिचे. पण आता कुठेतरी आजच्या पिढीमध्ये ते कमी झालं आहे असं दिसून येते यामध्ये त्या मुलांचा दोष नसतो असं मला वाटतं दोष असतो त्या वयाचा वा विचारांचा वा मिळालेल्या स्वातंत्र्याचा. आणि त्यामुळेच मुलांना प्रेम देखील बांधिलकी वाटू लागते, ते प्रेम नकोसं वाटू लागते.

माझ्या भूमिकेबद्दल सांगायचे झाले तर “आई” मालिकेमध्ये मी मिनाक्षी कुंटे या अशाच आईची भूमिका साकारणार आहे. जिचं तिच्या मुलीवर जिवापाड प्रेम आहे. या मालिकेत प्रेक्षकांना आई आणि मुलीचा अतिशय वेगळा असा प्रवास बघायला मिळणार आहे. आईला आपण देवासारखं मानतो. पण ती देखील शेवटी माणूस आहे त्यामुळे तिच्या चुका जारी असल्या तरी त्याची झळ ती कधीच मुलांपर्यंत पोहचू देत नाही आणि हीच तारेवरची कसरत मीनाक्षीची या मालिकेत होत आहे असं मला वाटतं. ही भूमिका साकारण अत्यंत मोठी जबाबदारी आहे. कारण मिनाक्षी समाजातील अनेक स्त्रियांच प्रतिनिधीत्व करते. एक खूप चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या मालिकेतून करतो आहे. आशा आहे तो आजच्या तरुण पिढीला आणि पालकांना विचार करण्यास भाग पडेल.

महेश कोठारे (आई या मालिकेचे निर्माते) म्हणाले, कलर्स मराठी परिवाराशी माझं खूप जुनं आणि घनिष्ठ नातं आहे आणि आई या मालिकेद्वारे मी पुन्हा एकदा या कुटुंबाशी जोडला जातो आहे याचा मला अभिमान आहे. आम्ही घेऊन येत आहोत एक आगळीवेगळी मालिका. एक अशी मालिका जी आजचे प्रश्न हाताळते मग ते आजच्या मुलांचे प्रश्न असो पालकांचे प्रश्न.

पालक मुलांना किती ओळखतात तर दुसरीकडे मुलांना त्यांच्या आईचं महत्व किती ठाऊक आहे यावर ही मालिका आधारलेली आहे. हा विषय हाताळताना आम्हाला अनेक आव्हांनाना सामोरे जावे लागले, पण तरीदेखील अत्यंत मेहनतीने आणि प्रेमाने ही मालिका आम्ही बनवत आहोत. आशा करतो रसिक प्रेक्षकांना आमची मालिका आणि हा प्रयत्न नक्कीच आवडेल.

नवीन जाणिवा, नवी भावना तरुण मुलीच्या मनात उमलतात. तरुणपणात मुलांना मुक्त संचार करायचा असतो कोणाच्याही बंधनाखाली न जागता… मग ते आई वडीलचं का असे ना ! या वयात चूक आणि बरोबर यामध्ये फरक करणं तितकसं कुठे कळतं असतं, आणि याच वयात आपल्याल योग्य मार्ग दाखवणारा माणूस आपला कट्टर दुश्मन आहे अशी आपली समजूत होते ही सत्य परिस्थिती आहे. पण योग्य वाट कळते तेव्हा रस्ता चुकलेलो असतो… अशाच वैचारिक, मानासिक द्वंद्वात अडकलेल्या मुलीला तिची आई मीनाक्षी कशी मदत करेल. तर जाणून घेण्यासाठी नक्की बघा २७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १०.००वा.

Back to top button