रंग माझा वेगळा : दीपा-कार्तिकमधला दुरावा दूर करण्यासाठी जेनेलिया घेणार पुढाकार
पुढारी ऑनलाईन डेस्क : मालिका ‘रंग माझा वेगळा’ने नुकताच ९०० भागांचा टप्पा पार केला. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच हा टप्पा गाठणं शक्य झालं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. दीपाविषयी कार्तिकच्या मनात असणारा गैरसमज लवकरच दूर होणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे कार्तिकच्या मनात असणारा हा गैरसमज दूर करण्यासाठी आणि निरपेक्ष प्रेमाचं महत्त्व पटवून देण्यासाठी जेनिलिया देशमुखची खास एन्ट्री होणार आहे. रितेश आणि जेनिलिया देशमुखचा वेड सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. निरपेक्ष प्रेम म्हणजे वेड असतं. याच निरपेक्ष प्रेमाचं महत्व पटवून देणाऱ्या वेड या सिनेमाची सध्या कमालीची उत्सुकता आहे. वेड सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने जेनिलियाने ‘रंग माझा वेगळा’ मध्ये हजेरी लावली.
जेनिलियासोबतचा हा भाग खास असेलच पण प्रेक्षकांना ज्या दिवसाची गेले कित्येक दिवस उत्सुकता होती, तो दिवस अखेर आलाय. कार्तिकने दीपाच्या चारित्र्यावर संशय घेऊन दोन्ही मुलींचा पिता होणं नाकारलं. दीपाला मुलीला वाढवताना बराच संघर्ष करावा लागला. मात्र कार्तिकला आता सत्य परिस्थितीचा उलगडा झालाय. त्यामुळे जाहीर माफी मागत तो सन्मानाने दीपाला पुन्हा घरी आणणार आहे. दीपा-कार्तिकच्या नात्याची नव्याने सुरुवात होणार आहे.