बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या नगारखान्यात तुतारी नाही, तर संघर्षाचा बिगुल वाजत होता, हे त्यांना कळालेही नाही. त्यांच्या दीर्घकालीन राजवटीत देशाच्या जीडीपीने विक्रमी उसळी घेतली असली तरी बांगल देशाच्या नागरिकांचे खिसे रिकामे झाले होते आणि त्यांना भारतात घुसखोरी करताना अन्य देशांत कचरा वेचण्यातही श्रीमंती वाटू लागली होती. जनता ही शेतातील एखाद्या रोपट्याप्रमाणे वाटत असेल आणि ती वार्याची एक झुळूक आल्याने जमिनीवर पडत असेलही; परंतु प्रत्यक्षात ती पुन्हा उभी राहू शकते. जे स्वप्नात राहतात, त्यानां जागे करण्याचे काम जनता करते.
आपण जनता जनार्दन आहोत. आपणच विविध ठिकाणी उभे राहिलो तर अस्वस्थ, हतबल, एकाकी, चाकर वाटू लागतो. अगदी किड्यामुंग्यांसारखे. फुंकर मारली तर उडून जाऊ. पायाखाली चिरडले तर आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणाही दिसणार नाहीत. जनावरासारखे आपल्याला हाकलले जाईल; पण या मुंग्या म्हणजे निसर्गाची अद्भुत कलाकृती आहे. काही वेळा हे मुंगळे मोठ्या इमारतीचा पाया ठिसूळ करू शकतात, पाया भुसभुशीत करू शकतात. जमिनीखाली असे भुयार तयार करतात की, ते मानवालाही शक्य नाही. मुंग्यांचा काही भरवसा नाही. त्या हत्तीवरही मात करू शकतात. अर्थात, या गोष्टी सर्वांनाच ठाऊक आहेत. तरीही मुंग्यांना कोणी घाबरत नाही. सर्वांना आपणच मोठे शक्तिमान असल्याचा भास वाटत राहतो. सर्वांना हत्ती असल्याचे वाटत राहते; पण हा भ्रमाचा फुटलेला भोपळा बांगला देशात पाहिला. एवढेच नाही, तर आपल्या शेजारच्या देशांत एका मुंगीने हत्तीला चितपट करताना पाहिले. सर्व ठिकाणी अजिंक्य वाटणारी मंडळी मुंग्यांसारख्या जनतेमुळे परागंदा होताना पाहील. ते निवडणूक आणि मतांच्या बळावर नाही, तर घराबाहेर पडलेल्या जनतेमुळे. त्यांनी आपले असस्तित्व दाखवून दिले आणि देशाचे संपूर्ण चित्रच पालटले. शेकडो वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये जे घडले होते तेच बांगला देश, श्रीलंकेतच दिसले नाही का? मत देणारी जनताच या कारभारांना विटली होती आणि परिणामी रस्त्यावर उतरली. हा इतिहास पुस्तकात नाही, तर जगातील अनेक देशांत उदाहरण म्हणून वेळोवेळी पाहवयास मिळाला आहे.
केवळ सत्ता, अध्यक्ष आणि हुकूमशहाच नाही, तर अजिंक्य वाटणारे अभिनेते, सेलिब्रिटींनाही जनतेच्या शक्तीसमोर नतमस्तक व्हावे लागले आहे. इराणचे शहाशासित राज्य जनतेने संपविले. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी जनतेच्या साथीने क्रांती घडवून आणली. त्यांनी तेथे इतिहास घडविला. अफगाणिस्तानला कोणीही गुलाम करू शकले नाही; कारण तेथील जनतेने गुलामी नाकारली होती. सत्ता पाडण्यात परकीयांचा हात असल्याचे बोलले जाते. कदाचित हे खरेही असेल; परंतु देशात कोठे ना कोठे ठिणगी पडत असेल म्हणूनच या संघटना, देश हस्तक्षेप करण्यास धजावतात. या शक्तींनादेखील जनतेचे पाठबळ हवे असते. जनतेशिवाय लढा म्हणजे इंजिनशिवाय रेल्वे असे म्हणावे लागेल. इंजिन तर जनताच आहे. अर्थात, सर्व गोष्टींना शेवट आहे, असे नेहमीच म्हटले गेले आहे आणि ते खरेच आहे. मग क्रूरकर्मा शासक असो किंवा प्रामाणिकपणे चालविणारा प्रतिनिधी असो, ते काळानुसार वेगवेगळ्या वातावरणाच्या प्रभावाखाली विखुरले जातात.
बांगला देशच्या शेख हसीना यांनी सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून देशाला समोर आणले. तरीही जनतेने त्यांचे उच्चाटन केले. जनता एवढ्यावरच थांबली नाही तर बांगला देशचे संस्थापक मुजिबूर रेहमान यांचे पुतळे फोडले, त्यांच्या घरांची पाडापाड केली आणि जमीनदोस्त केले. ते शेख हसीना यांचे वडील हा एवढाच त्यांचा राग हाेता. हसीना यांच्या नगारखान्यात तुतारी नाही, तर संघर्षाचा बिगुल वाजत होता, हे त्यांना कळालेही नाही. त्यांच्या दीर्घकालीन राजवटीत देशाच्या जीडीपीने विक्रमी उसळी घेतली असली तरी बांगलदेशाच्या नागरिकांचे खिसे रिकामे झाले होते आणि त्यांना भारतात घुसखोरी करताना अन्य देशांत कचरा वेचण्यातही श्रीमंती वाटू लागली होती. 2020 मध्ये एक संशोधन झाले. सत्तेतून बाहेर गेलेल्या 30 शासकांवर संशोधन करण्यात आले. जेव्हा एखादे चांगले सरकार जनतेला समान वागणूक आणि सेवा प्रदान करत असते आणि जादा पैसे वसूल करत नसेल, एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागत नसेल तर अशा प्रकारचे सरकार निरंकुश सरकारच्या तुलनेत वेगाने देशाची भरभराट करते.