

पुढारी ऑनलाईन डेस्क : बांगलादेशच्या सद्यस्थितीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भारत-बांगला देश सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने एक समिती स्थापन केल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म 'X' वर पोस्ट आज (दि.९) दिली. या समितीच्या अध्यक्षस्थानी सीमा सुरक्षा दलाच्या पूर्व कमांडचे एडीजी आहे. सीमेवर सीमा सुरक्षा दलाने दक्षता वाढवली आहे.
बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) दक्षता वाढवली आहे. बांगलादेशातील हिंसाचाराच्या घटनांमुळे भारत सरकारची चिंता वाढली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट केले की, बांगलादेशातील सध्याची परिस्थिती पाहता, भारत-बांगलादेश सीमेवरील (IBB) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. बांगला देशमधील भारतीय नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी समिती बांगलादेशातील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी संवाद साधेल, असेही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे.