

लोणावळा: लोणावळा नगर परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे निर्माण झालेल्या वादाचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर होऊ लागला आहे. मागील पाच दिवसांपासून हा वाद सुरू आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीच मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे लावल्यामुळे सर्वसामान्यांची कामे आता खऱ्या अर्थाने रेंगाळली आहेत.
नगरपरिषदेत एक हाती सत्ता असताना देखील राष्ट्रवादी काँग््रेास या ठिकाणी हतबल झाला असल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुनील शेळके यांनी हा वाद मिटवावा व समन्वयातून कामकाज पुन्हा एकदा सुरू व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाचे लोणावळा शहराध्यक्ष नासिर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे.
लोणावळा नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी नगरसेवकांचे ऐकत नाहीत. कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयामध्ये हजर नसतात, असे आरोप करत खुद्द नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनीच मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला शुक्रवारी टाळे लावले आहे. आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र, या आंदोलनात कोणताही तोडगा निघालेला नाही. मुख्याधिकारीदेखील कार्यालयामध्ये आलेले नाहीत. नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे खऱ्या अर्थाने आता नागरिकांची कामे रेंगाळू लागली आहेत.
शासन व प्रशासन यांनी हातात हात घालून काम केले तरच शहराचा विकास होऊ शकतो. लोणावळा नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे शहरामध्ये वेगाने विकासकामे होतील असे वाटत होते. मात्र, तूर्तास तरी तसे होताना दिसत नाही. लोणावळा नगर परिषदेमध्ये सुरू झालेला हा वाद मिटवणे व समन्वयातून काम सुरू करणे हाच यामधील मध्यम मार्ग असल्याने आमदार सुनील शेळके यांनी या माध्यमातून मध्यस्थी करावी व बंद पडलेला हा विकासाचा रथ पुन्हा सुरू करावा, अशी मागणी शेख यांनी केली आहे.
मुख्याधिकारी वेळ देत नसल्यामुळे जनतेची कामे रखडली आहेत, असे नगरसेवक म्हणत आहेत. मात्र, कोणती कामे रखडलेली आहेत याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही तर दुसरीकडे मुख्याधिकारी यांनी माझ्याकडे कोणतेही काम प्रलंबित नाही असे म्हणत कामाच्या बाबतीत मी अचूक आहे असे देखील दर्शविले आहे. त्यामुळे या वादात खरे कोण व खोटे कोण हे सर्वसामान्याला समजत नाही. याकरिता हा वाद मिटणे गरजेचे आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांनी आम्ही नवीन आहोत असे म्हणण्याऐवजी नगर परिषदेचे कामकाज समजून घेणे व त्या पद्धतीने अधिकारी वर्गाकडून काम करून घेणे गरजेचे आहे.