

marriage obstacles family harassment
लखनौ : घरचे लोक आपले लग्न लावून देत नाहीत, अशी तक्रार घेऊन उत्तर प्रदेशातील प्रयागराजमधील तरुणीने थेट पोलीस ठाणे गाठले. या घटनेचा १६ सेकंदांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, तिने आपल्या कुटुंबावर मारहाणीचेही आरोप केले आहेत.
तक्रारदार तरुणीने म्हटले आहे की, "माझे वय ४१ वर्षे झाले आहे आणि मला लग्न करायचे आहे, परंतु माझे कुटुंबीय लग्नासाठी तयार नाहीत. जेव्हा जेव्हा लग्नाचे एखादे स्थळ येते, तेव्हा भाऊ त्याला नकार देतात. लग्नात पैसे खर्च करावे लागतील, या भीतीने भाऊ लग्न लावून देत नसल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.
तरुणीने सांगितले की, तिच्या भावाने कुटुंबाची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे, तरीही तो लग्नाच्या खर्च करण्यास नकार देत आहे. . तक्रारदार महिला सराय इनायत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनापूर गावात राहते. तिने आपल्या तक्रारीत वडील, आई आणि बहिणीचाही समावेश केला आहे.
माधुरीने तक्रारीत म्हटले आहे की, ती गेल्या २० वर्षांपासून घरात एकाकी जीवन जगत आहे. कौटुंबिक कारणांमुळे तिच्या आई-वडिलांनी तिला वेगळे केले आहे. वडील रामराज पटेल, आई बिमला देवी, भाऊ राजेंद्र, वहिनी पूनम आणि बहीण विद्या हे सर्वजण आपल्याला शिवीगाळ करतात, असा तिचा आरोप आहे. तसेच तिचा मानसिक छळ केला जातो आणि तिला मारहाणही केली जाते.
माधुरीने पोलिसांकडे विनवणी केली आहे की, तिचे लग्न एखाद्या चांगल्या मुलाशी लावून द्यावे, जेणेकरून ती सन्मानाने जगू शकेल. कुटुंब आर्थिक मदत करत नाही आणि जेवणही देत नाही. ती स्वतः छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह करते. एके दिवशी या सर्वांनी तिच्या खोलीत घुसून तिला मारहाण केल्याचेही तिने तक्रारीत म्हटलं आहे.