

इंदूर: मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आलेल्या विजय कुमार दत्त याने पाच हजारांहून अधिक मुलींची खरेदी करत त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्याची कबुली दिली आहे. 25 वर्षांपूर्वी बांग्लादेशातून भारतात आलेला विजय मुंबईतील नालासोपारातील एका दाट लोक वस्तीत राहत होता. एसआयटीने त्याला साथीदार बबलूसह बाणगंगा परिसरातील कालिंदी गोल्ड सिटी येथे राहणाऱ्या उज्ज्वल ठाकूरच्या घरातून अटक केली आहे. उज्ज्वल, बबलू आणि सैजलच्या मदतीने त्याला इंदूरला वेश्याव्यवसायाचे केंद्र बनवायचे होते. इंदूरसह सुरत, राजस्थान, मुंबई आणि इतर पर्यटन स्थळी मुलींच्या पुरवठ्याची साखळी तयार करण्याचाही प्रयत्न होता.
आयजी हरिनारायणा चारी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार आरोपी विजय कुमार दत्तने चौकशीदरम्यान कबूल केले की, बनावट नाव वापरून तो वास्तव्य करत होता. अवैधरित्या भारतात आल्यानंतर तो मुंबईत स्थायिक झाला. बनावट मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड मिळवल्यानंतर त्याने पासपोर्ट बनवून घेतला आणि पत्नीला भेटण्याच्या बहाण्याने तो बांग्लादेशला जाऊ लागला.चौकशी दरम्यान विजय कुमारने असेही सांगितले की, बांग्लादेशातील शबाना आणि बख्तियारच्या माध्यमातून तो गरीब घरातील मुलींना नोकरीच्या बहाण्याने भारतात बोलावून त्यांना वेश्याव्यवसायात ढकलत असे. याआधी बांग्लादेशातून येणाऱ्या मुलींना नालासोपारा आणि इतर ठिकाणी लपवून ठेवायचा आणि स्वत: शारीरिक संबंध बनवायचा. विजयने जवळपास 10 मुलींशी विवाह केला आहे. 100 हून अधिक गर्लफ्रेंड आहेत. त्यांनाही तो वेश्याव्यवसाय करायला लावतो.
इंदूर, धार, अलीराजपूर, झाबुआ, सुरत, अहमदाबाद, जयपूर, बंगळुरू यासह विविध शहरांतील दलालांची साखळी त्याने तयार केल्याचेही सांगितले. आयजी मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांना शेकडो मुलींचा हिशेब मिळाला आहे, ज्यांना विजयने दलालांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शहरात पाठवले आहे. दारूची बाटली घेऊन मुलींच्या मधोमध फिल्मी गाण्यांवर डान्स करतानाचे त्याचे व्हिडिओही पोलिसांना सापडले आहेत. पोलिसांनी 4 मुलींनाही ताब्यात घेतले असून त्यापैकी दोन बांग्लादेशी असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजयच्या शोधात विजयनगर पोलिसांनी अनेकवेळा छापे टाकले, मात्र पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे लागत होते. एसपी (पूर्व विभाग) आशुतोष बागरी यांनी प्रोबेशनर आयपीएस मोती उर रहमान यांच्याकडे तपास सोपवल्याचे सांगितले. अधिक तपासासाठी एक टीम मुंबईला पाठवली आहे. यावेळीही विजय पोलिसांच्या हातातून निसटला आणि इंदूरला पळून आला. परंतु पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला उज्ज्वलच्या घरातून अटक केली.