उत्तर प्रदेश : पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका जोडप्याच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समाेर आली आहे. एका दत्तक घेतलेल्या मुलीने प्रियकराच्या मदतीने आई-वडिलांची हत्या (Murder Case) केली आहे. या प्रकरणी तिच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
कोमल आणि तिच्या प्रियकराचा आई-वडिलांच्या संपत्तीवर डोळा होता. त्यामुळेच तिने आई-वडिलांसह भाऊ अनूपची हत्या (Murder Case) करण्याचे ठरवले होते. यासाठी कोमलने प्रियकर रोहित आणि त्याचा भाऊ राहुल यांची मदत घेतली. राहुल हा मुंबई मिलिटरी इंटेलिजन्समध्ये रुग्णवाहिका कर्मचारी होता. त्याने कोमलला बेशुद्ध होण्यासाठीचे औषध आणून दिले. कोमलने तेच औषध आई-वडील आणि भाऊ अनूप यांना ज्यूसमध्ये मिसळून प्यायला दिले. आई-वडिल आणि भाऊ ते तिघेही बेशुद्ध झाले. मात्र, ज्यूसची चव चांगली नसल्याने अनूपने तो ज्यूस पिला नव्हता. तो झोपण्यासाठी वरच्या रूममध्ये गेला. ते दोघे बेशूद्ध झाल्याले पाहून कोमलने प्रियकराच्या मदतीने अगोदर वडिलांचा गळा चिरला व नंतर आईचा गळा कापला. या घटनेनंतर प्रियकर गेल्यावर कोमलने आरडाओरडा सुरू केली. पोलिसांना याची माहिती मिळाली.
पोलिस घटनास्थळी दाखल होताच कोमलने पोलिसांना सांगितले की, 'पप्पा बाहेर खोलीत झोपले होते. मी मधल्या खोलीत आईसोबत झोपले होते. भाऊ पहिल्या मजल्यावर झोपला होता. आम्ही सर्व झोपी गेल्यामुळे खून केव्हा झाला हे कळू शकले नाही. काही वेळाने आवाज ऐकून मी डोळे उघडले तेव्हा मला तीन लोक दिसले होते असे तिने पाोलिसांना सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान कोमलचा संशय आला त्यावेळी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची चौकशी सुरू केली असता तिने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसी खाक्या दाखवताच कोमलने घडलेला सर्व प्रकार सांगितला.
या घटनेनंतर पोलिसांनी प्रियकराला अटक केली. प्रियकराने मी कोमलच्या सांगण्यावरून हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. त्याने सांगितले की, कोमलने दरवाजा उघडला त्यावेळी तिने चाकूची देखील व्यवस्था केली होती व दोघांची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले..