

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये राष्ट्रीय 'ज्ञान भारतम्' अभियानाची घोषणा केली होती. देशातील विविध शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, मंदिरे, मठांमधील आणि वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखितांचे पद्धतशीरपणे सर्वेक्षण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Gyan Bharatam Mission: 40,000 Manuscripts Found in Jammu & Kashmir
श्रीनगर : राष्ट्रीय 'ज्ञान भारतम्' अभियानांतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये ४० हजार ऐतिहासिक हस्तलिखितांचा शोध घेण्यात यश आले आहे. या मोहिमेचे विशेष आकर्षण म्हणजे जम्मूच्या एका दुर्गम भागात सापडलेले १६ व्या शतकातील दुर्मिळ 'टाकरी' हस्तलिखित. हे हस्तलिखित या लिपीतील सर्वात जुन्या दस्तावेजांपैकी एक असून इतिहासकारांच्या दृष्टीने हा एक अमूल्य ठेवा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ मध्ये राष्ट्रीय 'ज्ञान भारतम्' अभियानाची घोषणा केली होती. देशातील विविध शैक्षणिक संस्था, संग्रहालये, ग्रंथालये, मंदिरे, मठांमधील आणि वैयक्तिक संग्रहातील हस्तलिखितांचे पद्धतशीरपणे सर्वेक्षण करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. पारंपरिक हस्तलिखितांची नोंदणी करण्याचे हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय 'ज्ञान भारतम्' अभियानाअंतर्गत काश्मीर विद्यापीठाचा 'पर्शियन विभाग' (फारसी विभाग) हे मुख्य केंद्र म्हणून काम पाहत आहे. नागरिकांच्या घरांमध्ये असलेली दुर्मिळ हस्तलिखिते शोधणे, त्यांचे जतन व संवर्धन करणे आणि त्यांची यादी तयार करणे, ही या विभागाची मुख्य जबाबदारी आहे. जम्मू-काश्मीरच्या सर्व २० जिल्ह्यांमधील प्रशासनाला या सर्वेक्षण कार्यात सहभागी करून घेण्यात आले आहे. हे सर्वेक्षण या वर्षी १६ मार्चपासून सुरू झाले असून ते किमान तीन महिने चालणार आहे.
"देशातील पारंपरिक ज्ञानाचे जतन व संवर्धन करण्यासाठी आणि एक 'ज्ञान भांडार' (Knowledge Bank) निर्माण करण्यासाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. आतापर्यंत आम्ही जम्मू-काश्मीरच्या विविध भागांतून ४०,००० हून अधिक हस्तलिखिते शोधली आहेत," असे पर्शियन विभागाचे प्रमुख आणि 'ज्ञान भारतम्' प्रकल्पाचे नोडल अधिकारी प्रा. जहांगीर इक्बाल यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितले.
जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत सापडलेल्या हस्तलिखितांपैकी बहुतांश हस्तलिखिते पर्शियन (फारसी) भाषेत आहेत; त्याखालोखाल काश्मिरी, अरबी, संस्कृत आणि पंजाबी भाषेतील हस्तलिखिते आढळली आहेत.
या सर्वेक्षणात जम्मूच्या 'गूल गुलाबगड' भागात १६ व्या शतकातील एक दुर्मिळ हस्तलिखित सापडले आहे. हे हस्तलिखित 'टाकरी' लिपीत असून, ही लिपी आता लुप्त झाली आहे. याव्यतिरिक्त आम्हाला वैद्यकशास्त्र, गणित आणि काव्य या विषयांवरील काही पर्शियन हस्तलिखितेही सापडली आहेत," असे इक्बाल यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पांतर्गत, जिल्हाधिकारी स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करतील. हे अधिकारी सर्वेक्षण करून, अशा दुर्मिळ हस्तलिखितांचा ताबा असलेल्या लोकांचे पत्ते शोधून काढतील. मुख्य कार्यालयातील तज्ज्ञ आणि संशोधक संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देतील. ते त्या हस्तलिखिताचे मूल्यमापन करतील. त्यानंतर दस्तावेज जतन केलेल्या मालकाची योग्य परवानगी घेऊन, त्या हस्तलिखिताचे जतन, भाषांतर आणि डिजिटायझेशन (डिजिटल स्वरूपात रूपांतर) करण्याची प्रक्रिया पार पाडतील. आम्ही या हस्तलिखितांचा ताबा त्यांच्या मालकांकडून घेणार नाही. आम्ही केवळ या हस्तलिखितांची यादी तयार करू, जेणेकरून इच्छुक संशोधक किंवा इतर कोणालाही जेव्हा गरज भासेल, तेव्हा ते संबंधित मालकाशी संपर्क साधू शकतील," अशीही माहिती इक्बाल यांनी दिली.
या सर्वेक्षणाविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने मशिदींचे इमाम आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे नियोजन केले आहे; जेणेकरून लोक या हस्तलिखितांविषयीची माहिती घेऊन स्वतःहून पुढे येतील. या हस्तलिखितांच्या जतन आणि संवर्धनासाठी 'केयू' (KU) येथे एक 'डिजिटायझेशन प्रयोगशाळा' आणि एक 'संवर्धन प्रयोगशाळा' उभारण्यात आली आहे. या मोहिमेच्या अखेरीस आम्ही किमान एक लाख हस्तलिखितांची सूची तयार करू अशी आम्हाला अपेक्षा आहे. हा ज्ञान-उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्वसामान्य जनता आम्हाला सहकार्य करतील, अशी आम्हाला आशा आहे," असे इक्बाल म्हणाले.
"आमची दुर्मिळ हस्तलिखिते आणि प्राचीन वस्तू १९४७ मध्ये ब्रिटिशांनी आपल्यासोबत नेल्या होत्या; त्या आजही विविध आंतरराष्ट्रीय अभिलेखागारांमध्ये आणि संग्रहालयांमध्ये पडून आहेत. त्या पाहण्यासाठी किंवा त्यांचा अभ्यास करण्यासाठी आम्हाला मोठी रक्कम मोजावी लागते. त्यामुळे, आता आपल्याकडे असलेल्या दस्तावेजांचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम आम्ही हाती घेतले आहे," असेही प्रा. जहांगीर इक्बाल यांनी सांगितले.