

World Economic Forum Report on Indian Economy
२०२५ आणि २०२६ मध्ये भारत जागतिक आर्थिक वाढीचे मुख्य इंजिन असेल, अशी शक्यता वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या मुख्य अर्थशास्त्रज्ञांच्या आऊटलुक अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. जगातील आघाडीच्या अर्थतज्ज्ञांच्या सर्वेक्षणावर आधारित हा अहवाल आहे. जागतिक पातळीवर अनिश्चितता असूनही भारताच्या मजबूत आर्थिक मूलभूत गोष्टी आणि आशावादी दृष्टिकोनाचा यात उल्लेख करण्यात आला आहे.
''दक्षिण आशिया आर्थिक विस्ताराबाबत सर्वात आशावादी आहे. विशेषतः या प्रदेशातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत विकासाचे प्रमुख इंजिन बनण्यास सज्ज असल्याचे दिसून येते." असे डब्ल्यूईएफने म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या जीडीपी वीढाचा दर २०२५ मध्ये ६.२ टक्के आणि २०२६ मध्ये ६.३ टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे. यामुळे भारत दक्षिण आशियातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनेल. या मजबूत वाढीमुळे भारत या प्रदेशाच्या आर्थिक वाढीत आघाडी मिळवण्याची शक्यता आहे.
दक्षिण आशिया काही आव्हानांना तोंड देत आहे. यात बदललेल्या चिनी निर्यातीचा परिणामाचा समावेश आहे. पण तरीही सकारात्मक चिन्हे दिसत असल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.
भारत आणि ब्रिटन यांच्यात नुकत्याच झालेल्या द्विपक्षीय व्यापार करारामुळे भारताच्या व्यापार दृष्टिकोनाला चालना मिळाली. अशाप्रकारच्या आर्थिक घडामोडींमुळे अर्थतज्ज्ञांचा भारतावरील विश्वास आणखी दृढ झाला आहे, असे WEF ने नमूद केले आहे.
संपूर्ण जगाच्या तुलनेत दक्षिण आशियाकडे सर्वात आशादायी म्हणून पाहिले जात आहे. एक तृतीयांश म्हणजे ३३ टक्के अर्थशास्त्रज्ञांनी २०२५ मधील उर्वरित काळात या प्रदेशात मजबूत अथवा खूप मजबूत वाढीची शक्यता व्यक्त केली आहे.
दरम्यान, येथील परिस्थिती चिंतेविना नसेल. कारण अलीकडील काही दिवसात भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावामुळे या प्रदेशात अनिश्चितता वाढली. येथील महागाईच्या बाबतीत, बहुतांश आघाडीच्या अर्थतज्ज्ञांना येत्या काही महिन्यांत दक्षिण आशियातील किमतीत मध्यम (६१ टक्के) ते उच्च (२६ टक्के) वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
जागतिक स्तरावर, आर्थिक परिस्थिती कमकुवत राहिली आहे. विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून जागतिक अर्थव्यवस्थेची एकूण स्थिती कमकुवत झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. अमेरिकेचे बदलते आर्थिक आणि व्यापार धोरण ही यामागील एक प्रमुख चिंता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जागतिक स्तरावर अनेक आव्हाने असूनही, मजबूत आर्थिक निर्देशक, व्यापारातील वाढ आणि गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास यामुळे भारत आणि दक्षिण आशियाचे भविष्य उज्ज्वल असल्याचे भाकित या अहवालात व्यक्त करण्यात आले आहेत.